
राज्याच्या अर्थसंकल्पाची मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अजित पवार हे विधानभवनात बजेट सादर होत आहेत. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी कोणत्या नव्या घोषणा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सत्तेच रणांगण सज्ज झालेलं आहे. राजकारणाच्या मैदानात सध्या रणशिंग फुंकले गेले आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्याची वेळ जवळ आली आहे, आणि संपूर्ण राज्याचे लक्ष या महत्त्वाच्या क्षणावर केंद्रित झाले आहे.अनुभवी अर्थतज्ज्ञ आणि सध्याचे अर्थमंत्री अजित पवार हे बजेट सादर करीत आहेत.
अर्थसंकल्पाच्या या पर्वात सर्वसामान्य नागरिक, उद्योगपती, शेतकरी, आणि बेरोजगार युवक आपल्यासाठी काय घोषणा होणार याची वाट पाहत आहेत. अजित पवार हे नेहमीप्रमाणे आपल्या स्टाइलिश राखडी जॅकेट आणि हातात अर्थसंकल्पीय दस्तऐवज घेऊन विधानभवनाच्या दिशेने कूच करत आहेत. त्याचवेळी, राखाडी रंगाच्या जॅकेटमध्ये आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत आपली उपस्थिती लावली आहे. या दोघांच्या आगमनाने विधिमंडळ परिसरात चैतन्य निर्माण झाले आहे.

मोठ्या घोषणा
महाराष्ट्राचा बहुप्रतीक्षित अर्थसंकल्पाला सुरुवात झालेली आहे. यंदाच्या बजेटमध्ये कोणत्या क्षेत्राला मोठा निधी मिळणार? कुठल्या नव्या योजनांची घोषणा होणार? राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी कितपत उपलब्ध होतील? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून बसले आहेत.
यंदा रोजगार निर्मितीला विशेष प्राधान्य दिले जाईल. वाढवण बंदराच्या विस्तारासाठी मोठी तरतूद करण्यात येणार आहे, ज्यामुळे हजारो रोजगार उपलब्ध होतील. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा विभागात नव्या उद्योगांना चालना देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. महायुती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांचे सरकार आहे, आणि ते त्यांच्या हिताचेच निर्णय घेणार, असे आशिष देशमुखांचे म्हणणे आहे.
विरोधकांचा घशाला कोरड
अर्थसंकल्पानंतर विरोधकांना उत्तर देण्यासाठी फारसा वाव उरणार नाही, असे महायुतीचे नेते सांगत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर जोरदार हल्लाबोल करत, सध्याचे सरकार हे जनहिताची कामे करणारे सरकार असल्याचा दावा देशमुखांनी केलेला आहे.
मागील काही वर्षांत महाराष्ट्राच्या विकासदराला मंदीचा फटका बसला होता. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात नव्या गुंतवणुकीला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.
लोकांच्या आशा उंचावलेल्या
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी किंवा सवलतींची तरतूद होईल का? इंधन दरवाढ आणि महागाईच्या झळा सोसणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी काही सवलती जाहीर केल्या जातील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शिवाय, महिलांसाठी विशेष अनुदान आणि शिष्यवृत्ती योजना आणण्याबाबतही चर्चा सुरू आहे.
अर्थसंकल्पात कोणते निर्णय होणार, हे पाहण्यासाठी अवघे महाराष्ट्रवासीय उत्सुक आहेत. नव्या योजनांची घोषणा आणि निधीच्या वाटपावर राज्याच्या भविष्यातील दिशा अवलंबून असेल. महायुती सरकारचा हा पहिला मोठा आर्थिक निर्णय असल्याने, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ न राहता, जनसामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा असेल, याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.