
महाराष्ट्र विधानपरिषद पोटनिवडणुकसाठी भाजपने संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी पोटनिवडणुकसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी होणारी ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणांवर प्रभाव टाकण्याची संधी भाजपला मिळाल्याने पक्षाने ती दोन्ही हातांनी स्वीकारली आहे.
विधान परिषदेची ही निवडणूक पक्षाच्या भविष्यासाठी निर्णायक ठरेल. येणाऱ्या काळात ही निवडणूक भाजपला स्वतःची ताकद सिद्ध करण्याची आणि विरोधकांना कोंडीत पकडण्याची सुवर्णसंधी आहे. पक्षाने यासाठी मजबूत उमेदवारांची निवड केली आहे. संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केणेकर आणि दादाराव यादवराव केचे या तीन प्रमुख नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे तिन्ही नेते राजकीय तसेच सामाजिक पातळीवर प्रभावी कार्यरत आहे.

जोशींना पुन्हा संधी
नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकसाठी संधी दिली आहे. याआधी नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत ते पराभूत झाले होते. त्यांच्या पराभवामुळे पहिल्यांदाच नागपूर पदवीधर मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला होता, आणि अभिजीत वंजारी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्या पराभवानंतर नागपूर भाजपमध्ये अनेक अंतर्गत मतभेद निर्माण झाले होते.
भाजप पक्षाने मात्र त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. संदीप जोशी हे भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा मिळाला आहे. या निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळवून पक्षाचे स्थान भक्कम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
NCP Politics : महायुतीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची तातडीची बैठक
दिलेला शब्द पाळला
दुसरे महत्त्वाचे उमेदवार दादाराव केचे हे वर्धा जिल्ह्यातील आहेत. मागील निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या आर्वी मतदारसंघात बंडखोरी केली होती. भाजपने वर्धा मतदारसंघातून सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली होती, मात्र दादाराव केचे यांनी त्याविरोधात बंड पुकारले. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना समजूत घालत वचन दिले होते की त्यांना विधान परिषदेत संधी दिली जाईल. आता ते वचन पूर्ण करत भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
यंदाची ही पोटनिवडणूक जरी विधान परिषदेतील काही जागांसाठी असली तरी तिचा प्रभाव महाराष्ट्रातील मोठ्या सत्तासमीकरणांवर पडणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र स्पष्ट होत आहे. भाजपला अधिक मजबूत स्थितीत आणण्याची आणि विरोधकांना कमजोर करण्याची ही सुवर्णसंधी आहे. निवडणुकसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2025 आहे. 27 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.