
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरएसएसच्या शाखेला दिलेल्या भेटीच्या दाव्यामुळे आधीच चर्चेला उधाण आले असताना, आता संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आणखी एक खळबळजनक दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील शाखेला तसेच एका शिबिराला भेट दिली होती, असा दावा संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी नुकताच केला आहे. संघाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी हा उल्लेख केल्याने चर्चेचे वादळ पुन्हा उसळले आहे. या आधी, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील 2 जानेवारी 1940 रोजी साताऱ्यातील कराड येथे संघाच्या शाखेला भेट दिली होती, असा दावा संघाच्या माध्यम शाखेने केला होता. त्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या चर्चेला नव्याने जोर चढत असतानाच, आंबेकर यांच्या गांधीजींबाबतच्या विधानाने राजकीय व ऐतिहासिक वर्तुळात खळबळ उडवली आहे.
सुनील आंबेकर म्हणाले की, 1937 मध्ये महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शिबिराला भेट दिली होती आणि त्या वेळी त्यांनी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी संवाद साधला होता. एवढेच नव्हे, तर 1947 मध्ये गांधीजींनी दिल्लीतील वाल्मिकी मंदिर परिसरातील संघ शाखेला देखील भेट दिली होती. ते डॉ. माधव पात्रिकर लिखित डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी एक दर्शन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. नागपूरच्या सेवासदन परिसरात आयोजित या कार्यक्रमात गांधी-विनोबा विचारांचे अभ्यासक डॉ. अपरुप अडावतकर आणि लाखे प्रकाशनचे चंद्रकांत लाखे उपस्थित होते.महात्मा गांधी आणि डॉ. हेडगेवार यांच्यात तुलना करणे आवश्यक नाही. दोघांनीही स्वतंत्र मार्गाने देश उभारणीचे कार्य केले.

Buldhana : पानसरेंच्या थेट कृतीने गृह विभागाच्या भिंती हादरल्या
फाळणीवर नवा प्रश्न
गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने समाज जोडण्याचा प्रयत्न केला, तर हेडगेवार यांनी एक मजबूत हिंदू संघटना उभारून समाज संघटीत करण्याचा प्रयत्न केला, असे आंबेकर यांनी नमूद केले.त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचेही उदाहरण देत सांगितले की, प्रत्येकाने आपल्या मार्गाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. त्यांच्या मते, गांधीजी आणि हेडगेवार दोघांनीही रामराज्याची संकल्पना मांडली होती आणि देश एकसंघ राहावा, यासाठी प्रयत्न केले.भारताची फाळणी ही हिंदुत्वाच्या कमकुवततेमुळे झाली की नेतृत्वाच्या अपयशामुळे, हा चर्चेचा विषय राहिल, असे आंबेकर म्हणाले. त्यांनी यावर अधिक प्रकाश टाकताना सांगितले की, गांधीजींनी फाळणीला विरोध केला होता आणि त्यांचे प्रयत्न भारत एकत्र ठेवण्यासाठी होते.
डॉ. अपरुप अडावतकर यांनीही समाजमाध्यमांवर गांधीजींविषयी पसरवली जाणारी चुकीची माहिती हा मोठा धोका असल्याचे सांगितले. महात्मा गांधी यांना समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या लिखाणाकडे पाहा. अफवांपेक्षा मूळ साहित्यातच त्यांचे खरे विचार सापडतील, असे ते म्हणाले.या विधानांनी पुन्हा एकदा संघ आणि स्वातंत्र्य चळवळीतील महापुरुष यांच्यातील संबंध चर्चेत आणले आहेत. काहींसाठी हा इतिहासाचे नव्याने पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न आहे, तर काहींसाठी ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभी राहिलेली रणनीती.