महावितरणने ऊर्जा मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकनात 93 गुण मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. या अभूतपूर्व यशामागे कंपनीच्या धोरणात्मक नेतृत्वाने आणि कार्यक्षम व्यवस्थापनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मानांकनात महावितरण कंपनीने 100 पैकी 93 गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार म्हणून महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व ठळकपणे समोर येते. धोरणात्मक निर्णय आणि द्रष्ट्या नेतृत्वाच्या जोरावर महावितरणने ऊर्जा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. लोकेश चंद्र यांनी या यशाचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाला आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर तसेच अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या सहकार्याला दिले आहे.
ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने आरईसी आणि पॉवर फाउंडेशन ऑफ इंडियाने तयार केलेल्या या मानांकनात पाच प्रमुख निकषांचा समावेश होता: संसाधन पर्याप्तता, ऊर्जा परिवर्तन, नियामक प्रशासन, आर्थिक स्थैर्य आणि सेवा सुलभता. महावितरणने संसाधन पर्याप्तता, ऊर्जा परिवर्तन आणि नियामक प्रशासन या निकषांमध्ये परिपूर्ण कामगिरी करत पूर्ण गुण मिळवले. आर्थिक स्थैर्यामध्ये 25 पैकी 24 आणि सेवा सुलभतेमध्ये 23 पैकी 17 गुण मिळाले. या एकूण 93 गुणांसह महाराष्ट्राने ‘ए’ श्रेणी मिळवत मध्य प्रदेश, गोवा, गुजरात यांसारख्या राज्यांना मागे टाकले.
ऊर्जा परिवर्तनाचा अध्याय
महावितरणने मागील काही वर्षांत ग्राहक सेवा आणि ऊर्जा नियोजनात क्रांतिकारी बदल घडवले. लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातील वीज मागणी लक्षात घेऊन 45 हजार मेगावॅट वीज खरेदी करार पूर्णत्वास गेले. यामुळे पुढील पाच वर्षांत 66 हजार कोटी रुपयांची बचत अपेक्षित आहे. ही बचत ग्राहकांना वीजदर कपातीच्या रूपाने लाभली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीने प्रेरित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 16 हजार मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प राबवला जात आहे.
महावितरणने आरडीएसएस योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली आहे. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वीज वितरण प्रणाली बळकट करण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. लोकेश चंद्र यांच्या कुशल व्यवस्थापनामुळे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या धोरणात्मक नेतृत्वामुळे महावितरणने ऊर्जा क्षेत्रात नावलौकिक मिळवला. या सर्व यशस्वी प्रयत्नांनी महावितरणला देशात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळाले, जे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
