
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही, परंतु यश यश मिळाले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये आशेची लाट म्हटली होती. पण हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धूळ चाखावी लागली. त्यानंतर पक्षाध्यक्षांनी काँग्रेस मधील नेत्यांना नवे निर्देश दिले आहेत.
दिल्लीतील इंदिरा भवन येथे 19 फेब्रुवारी बुधवारी झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या भविष्यासंदर्भात ठोस निर्णय घेतले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला बसलेल्या धक्क्याचा विचार करून संघटनात्मक बदलांची गती वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पराभवाला जबाबदार ठरणाऱ्या घटकांवर गंभीरपणे चर्चा झाली. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव तसेच राज्य प्रभारींना स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला की, “परिणामकारक जबाबदारी पार पाडली नाही, तर पदांवर राहण्याचा अधिकार राहणार नाही.
हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली या महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे सखोल विश्लेषण करून पक्षाने संघटनात्मक बदल हाती घेतले आहेत. महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच, विविध राज्यांमध्ये प्रभारी बदल करण्यात आले असून अनुभवी नेता राजीव शुक्ला यांच्यासह काहींना प्रभारी पदांवरून मुक्त करण्यात आले आहे.

बदल घडतील
गेल्या दोन कार्यकारिणी बैठकींमध्ये पक्षात मोठे बदल केले जातील, असे आपण जाहीरपणे सांगितल्याचे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. आता त्याची सुरुवात झाली असून पुढील काळात आणखीही व्यापक सुधारणा केल्या जातील, असेही खरगे यांनी सांगितले. या बैठकीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सर्व राष्ट्रीय महासचिव, राज्य प्रभारी उपस्थित होते.
आगामी काळात निवडणुकींसाठी काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मतदारयादीतील अनियमितता, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियुक्तीवरील वाद, संविधानाच्या उल्लंघनाचे मुद्दे जनतेसमोर ठळकपणे मांडण्याचे निर्देश खरगेंनी दिले.
नवे कठोर धोरण
“संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने अनेक बाहेरच्या नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला गेला. मात्र, अडचणीच्या काळात त्यांनी पक्षाला साथ दिली नाही आणि संधीसाधू वृत्तीने पक्ष सोडून पळाले, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. यामुळे काँग्रेसने पक्षप्रवेशाबाबत नवे कठोर धोरण आखले आहे. काँग्रेसच्या विचारधारेशी निष्ठा ठेवणाऱ्या आणि पक्षाच्या कठीण काळातही त्यासोबत राहणाऱ्या नेत्यांनाच पक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
“भाजपच्या तुलनेत काँग्रेसची बुथस्तरावरील संघटना दुबळी असल्याचे निवडणुकीतील पराभवाचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे महासचिव आणि प्रभारींनी प्रत्यक्ष बुथस्तरावर जाऊन कार्यकर्त्यांना भेटावे. पक्षाच्या विचारांशी निष्ठा असणाऱ्या नव्या लोकांना जोडावे, असे खरगे म्हणाले.
पक्षाला पुन्हा सक्षम करण्यासाठी संघटनात्मक सुधारणा, बुथस्तरावर कार्यकर्त्यांची नवी उभारणी आणि वैचारिक स्पष्टता यांवर काँग्रेसने भर देण्याचा निर्णय घेतला आहे. खरगेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नव्या ऊर्जा आणि रणनीतीसह राजकीय रणांगणात उतरण्यास सज्ज झाली आहे.