
अनेक दिवसापासून प्रतीक्षा असलेला नागपुरातील मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग भुयारी मार्ग जनतेसाठी खुले झाले आहे.
मनीषनगर आणि वर्धा मार्गाला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित भुयारी मार्गाचे (आरयूबी) अखेर लोकार्पण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा अंडर पास मंगळवारी सायंकाळी नागपूरकरांच्या सेवेत समर्पित करण्यात आला. हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्याने मनीषनगर, नरेंद्रनगर, बेसा आणि बेलतरोडी येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जवळपास 33.83 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेल्या या भुयारी मार्गाचे बांधकाम दोन वेळा मुदतवाढ मिळून अखेर पूर्ण करण्यात आले. फेब्रुवारी 2023 मध्ये निविदा अंतिम झाल्यानंतर जुलै 2023 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. काम फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करायचे उद्दिष्ट होते.मात्र, बांधकामाला विलंब होत गेला आणि अखेर जानेवारी 2025 मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले. या भुयारी मार्गाची लांबी 190 मीटर, रुंदी 8 मीटर, तर उंची 4 मीटर अशी आहे. पायी प्रवाशांसाठी पायऱ्या आणि फुटपाथची सोय करण्यात आली आहे.

विदर्भात Thackeray गटाचा एल्गार! MSRTC भाडेवाढीविरोधात चक्काजाम आंदोलन
नागरिकांचा संयम तुटला
काम लांबणीवर पडल्यामुळे संतप्त नागरिकांनी या भुयारी मार्गाचा स्वतः वापर सुरू केला होता. मात्र पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून मार्ग बंद केला. अखेर सर्व औपचारिकता पूर्ण करून आता अधिकृतरीत्या या अंडर पासचे लोकार्पण करण्यात आले आहे.
विकासाची दिशा बदलणारा प्रकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मनीषनगर, बेसा आणि सोमलवाडा परिसरातील नागरिक मागील 25 वर्षांपासून या रेल्वे क्रॉसिंगच्या समस्येने त्रस्त होते. पूर्वी उभारलेल्या एका मार्गाने ही समस्या सुटली नव्हती. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली दुसरी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तिसऱ्या प्रकल्पाचीही लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनीषनगरच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि अतिक्रमण दूर करण्याची गरज अधोरेखित केली. रेडीसन ब्लू हॉटेलच्या बाजूला क्रिकेट अकादमीजवळ आणखी एक पूल बांधण्याची घोषणाही त्यांनी केली, या नवीन पुलामुळे ज्यामुळे मनीषनगरकडे येण्यासाठी आणखी सोय होईल.
नागरिकांची समस्या संपली, आता जलद प्रवासाची सुविधा
या भुयारी मार्गामुळे रेल्वे फाटकांवर प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. नागपूरकरांना आता वाहतुकीत कोणत्याही अडचणीशिवाय मनीषनगर आणि वर्धा मार्गावर सहज प्रवास करता येणार आहे. या लोकार्पणाने नागपूरच्या विकासाला नवा वेग मिळाला आहे.