महाराष्ट्र

Praveen Tewatiya : गोळ्या अंगावर झेलल्या तेव्हा मराठीचे ठेकेदार कुठे होते?

Raj Thackeray : 26/11 मधील मरीन कमांडोचा थेट इशारा

Author

26/11 मधील हल्ल्यात शौर्य गाजवलेल्या मरीन कमांडो प्रवीण तेवतिया यांनी भाषावादावर संताप व्यक्त करत राज ठाकरेंच्या विधानांना थेट उत्तर दिलं आहे. मी यूपीचा असलो तरी महाराष्ट्रासाठी लढलो, असा त्यांचा ठाम संदेश आहे.

मुंबईवर झालेल्या 26/11 मधील भीषण दहशतवादी हल्ल्याला 17 वर्षांचा कालावधी उलटून गेला असला, तरी त्या रात्रीच्या रणसंग्रामाचे पडसाद आजही देशाच्या मनात जिवंत आहेत. मात्र, अलीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भाषा, भूभाग आणि प्रादेशिक अस्मिता याच्या नावाने उगाळला जाणारा वाद या जखमेवर मीठ चोळणारा ठरतो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषिक विधानांवर थेट प्रत्युत्तर देत, 26/11 मधील हल्ल्यात जीवावर उदार होऊन लढणाऱ्या मरीन कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी भावनिक आणि खणखणीत स्वरात एक स्फोटक विधान केलं आहे.

उत्तर प्रदेशातून असलेले तेवतिया हे माजी मरीन कमांडो असून त्यांनी 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यात ताज हॉटेलमधील नागरिकांना वाचवताना आपल्या शरीरावर गोळ्यांचा मारा झेलला होता. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या लढाईचा फोटो शेअर करत एक संदेश लिहिला. त्यात होता रणधुरंधरांचा आत्मा, राष्ट्राच्या ओळखीची व्याख्या आणि भाषावादाच्या ढोंगीपणावर जोरदार चपराक.

Nitin Gadkari : प्रसादाच्या बहाण्याने न्यायाचा फास 

भारतीय सैनिकाची राष्ट्रनिष्ठा

ऑपरेशन दरम्यान चार गोळ्या लागूनही, तेवतिया यांनी माघार नाकारली. रक्तबंबाळ अवस्थेतही त्यांनी शेकडो नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या शौर्याने सुमारे 150 लोकांचे प्राण वाचले. पण आज, त्याच मुंबईत, त्याच भूमीत, भाषेच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना तेवतिया यांचं संपूर्ण योगदान विसरल्यासारखं वाटतं.

एका उत्तर भारतीयाने महाराष्ट्रासाठी आपले प्राण पणाला लावले, हे विसरून भाषेच्या आधारावर देशभक्तीची परीक्षा घेणं हा प्रकार राष्ट्रनिष्ठेला ठेच देणारा आहे. तेवतिया यांचं संपूर्ण जीवन हे ‘भारत माझा देश आहे’ या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे भाषेच्या भिंती उभ्या करायच्या प्रयत्नांना त्यांनी तिरस्कारपूर्वक धारेवर धरले आहे.

Nitin Gadkari : भविष्यात कचऱ्यासाठी होतील दंगली

भाषेवरून विभागणी नको 

तेवतिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, देश भाषेवरून नव्हे तर भावनांवरून बनतो. ही ओळ केवळ शब्द नव्हे, तर स्फोटक विधान आहे. भाषिक अस्मितेचा बुरखा पांघरून विभाजनाचं राजकारण करणाऱ्यांना हा संदेश धक्का देणारा ठरला. त्यांच्या या पोस्टमुळे केवळ राज ठाकरेच नव्हे, तर त्यांच्या विचारधारेचं समर्थन करणाऱ्या अनेक मंडळींना आत्मपरीक्षण करावं लागलं आहे.

एका लढवय्या सैनिकाने युद्धभूमीवर लढताना मी कोणत्या राज्याचा आहे? हे कधीच पाहिलं नाही. मग राजकारणी हे मुद्दे उकरून समाजात तेढ निर्माण का करत आहेत? हे तेवतिया यांच्या भूमिकेतील धगधगत्या प्रश्नांचा मूळ गाभा आहे. त्यांनी जे व्यक्त केलं ते म्हणजे राजकारणाच्या बुडबुड्यांवर प्रहार करणारा, खऱ्या राष्ट्रप्रेमाचा आरसा आहे.

 

अस्मितेच्या नाटकांना खतपाणी

राजकीय आकसाच्या भरात भाषेवरून विद्वेष वाढवण्याचा हा प्रकार 26/11 मधील शहीदांच्या स्मृतींचाही अवमान करणारा ठरतो. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी नव्हे, माणुसकी, एकता आणि समरसतेच्या भाषेत भारत बोलतो. तेवतिया यांचं आयुष्य म्हणजे त्याच भाषेचा मूर्तिमंत अनुभव आहे.

प्रवीण तेवतिया हे केवळ एक माजी कमांडो नाहीत, तर ते आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. त्यांनी जे अनुभवलं ते खऱ्या अर्थाने ‘राष्ट्र प्रथम’ हे मूल्य सांगणारं आहे. त्यांच्या या थेट आणि धारदार शब्दांनी राजकीय पटलावर खळबळ उडवली असली तरी ही खळबळ आवश्यक होती. कारण देश एकसंध ठेवायचा असेल तर भाषा नव्हे, तर भावना आणि बंध या प्राथमिक गोष्टी असतात.

राजकारणात भाषा आणि प्रांताच्या नावावर मते मागणारे अनेक जण असतील, पण रणांगणात कोणी कुठल्या भाषेत ओरडतो याला शत्रू काहीच महत्त्व देत नाही. देश वाचवताना सैनिकासाठी केवळ एकच गोष्ट महत्त्वाची असते – देश. तेवतिया यांनी तीच भूमिका पुन्हा एकदा उजळवली आहे. त्यांच्या आवाजाने एक स्पष्ट संदेश दिला आहे. देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या राजकारणाला आता जाब दिला जाईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!