
मार्च 2025 मध्ये शनी राशी बदल करणार आहे. त्यानंतर काही राशींना साडेसाती तर काहींना ढय्या लागणार आहे. मात्र भंडाऱ्यात माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्याशी दगा करणाऱ्यांना जिल्हा परिषदेत आजच ढय्या लागली आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे देखील ‘चेकमेट’ झाले आहेत.
ज्योतिष्य शास्त्रात साडेसाती ही शनीची पीडा सर्वांत त्रासदायक असते. परंतु त्याही पेक्षा शनीची अडीच वर्षांची ढय्या भयंकर त्रासाची ठरते. त्याला अडीचकीही म्हटले जाते. अशीच ढय्या आता भंडारा जिल्हा परिषदेतील अनेकांना भोगावी लागणार आहे. काँग्रेसनं काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्हा परिषदेवर ताबा मिळविला. अध्यक्षपद महायुतीकडून हिसकावलं. त्यानंतर महायुतीमध्ये काँग्रेसनं फूट पाडली. विषय समिती सभापती पदावरही कब्जा मिळविला. या दगा फटक्याचा आमदार डॉ. परिणय फुके यांच्याकडून ‘करारा जवाब मिलेगा’ हे ‘द लोकहित लाइव्ह’ने नमूद केलं होतं. त्यानुसार परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे.
महायुती सरकारकडून मंगळवार, 18 फेब्रुवारीला नऊ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यात मिलिंद साळवे यांना भंडारा जिल्हा परिषदेत पाठविण्यात आले आहे. साळवे यांची आतापर्यंतची कारकीर्द पाहता भंडारा जिल्हा परिषदेत महायुतीसोबत पंगा घेणाऱ्यांना आता शनीच्या कडक ढय्याचा सामना करावा लागेल, असेच बोललं जात आहे. कोणत्याही खेळापेक्षा बुद्धीबळात माणसाचा अधिक कस लागतो. या खेळात स्वत:पेक्षाही समोरचा काय चाल चालेल याचा विचार करावा लागतो. प्रतिस्पर्धी चाल खेळला की लगेचच त्याची कोंडी करतो तोच बुद्धीच्या बळाचा राजा ठरतो.

नाना झाले चेकमेट
माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे बुद्धीबळ असोसिएशनचे पदाधिकारी आहे. बुद्धीबळात ते तरबेज आहेत. राजकारणाच्या सारीपाटावर आजपर्यंत त्यांनी अनेकांना ‘चेकमेट’ केले. भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसनं ताबा मिळविला. पण राज्यात अन् केंद्रात महायुतीचं सरकार आहे. त्यामुळं ताबा मिळवूनही काय उपयोग होणार, याचा विचार काँग्रेसनं केला नाही. महायुतीमधून फुटणाऱ्यांनाही याचा स्वप्नात विचार केला नसेल. ‘ओव्हर कॉफिडन्स’मध्ये महायुतीमधील काहींनी जिल्हा परिषद निवडणुकीत चाल खेळत ‘चेक’ दिला. पण आता आमदार नाना पटोले यांच्यासह साऱ्यांना डॉ. परिणय फुके यांनी ‘चेकमेट’ केले आहे. जिल्हा परिषदेत डॉ. फुके यांना असा ‘वजीर’ मिळाला आहे, तो प्रतिस्पर्धी गटाचे हत्ती, घोडे, उंट सगळेच अडीच वर्षात त्रासून सोडेल. त्यामुळं आता भंडारा जिल्हा परिषदेचे खरे राजा डॉ. परिणय फुके ठरतील असंच म्हणावे लागेल.
मिलिंद साळवे हे आयएएस आहेत. वेगळ्या पठडीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळं आता अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती अशी कोणाचीही डाळ जिल्हा परिषदेत गळणार नाही. साळवे कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करणारे आहेत. सगळे अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत एकीकडे आहे. मिलिंद साळवे यांची काम करण्याची पद्धत अत्यंत वेगळी आहे. त्यामुळं येणाऱ्या अडीच वर्षात ‘सब कुछ पा लेंगे’ अशा भ्रमात असलेल्यांची निराशा होणार आहे. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. यासाठी काही नेत्यांना हाताशी धरण्यात आलं. आता या सगळ्यांचीच आगामी काळात ‘वाट’ लागण्याची शक्यता बळावली आहे.