
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणत कायदा व सुव्यस्थेचं राज्य पोलिस राखतात. पण याच खाकी वर्दीवाल्यांच्या कुटुंबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोलिसांच्या परिवारात मिसळत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी त्यांच्या व्यथा, वेदना जाणून घेतल्या.
कुणाचे वडिल, कुणाचा नवा, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा पोलिस दलात. सण, वार, उत्सव, जगणं, मरणं असं सगळं विसरून खाकी वर्दीवाला ऑन ड्यूटी 24 तास असतो. दंगल झाली की जमाव दगडं मारणार ते पोलिसांनाच. नेत्यांचे दौरे म्हटले की तहानभूक हरपून बंदोबस्तासाठी उभा राहणार तो पोलिसच. लॉकडाऊन, पूर असो की भूकंप मदतीला धावणार तो पोलिसच. मात्र याच पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्याहीपेक्षा अनेकदा पोलिसांच्या परिवाराला प्रचंड परवड सहन करावी लागते. जुनाट पोलिस वसाहतींमध्ये छोट्या घरात दिवस काढावे लागतात. रात्ररात्रभर मुलाबाळांसह पोलिसांच्या बायकांनी क्वॉर्टरमध्ये एकटं राहावं लागतं. सलग बंदोबस्त असला तर मुलाच्या शाळेतील कार्यक्रमात त्याचं कौतुक पाहण्यासाठी जाण्यापुरताही वेळ पोलिसाला मिळत नाही. अशात खाकी वर्दीत एखादी महिला असेल तर तिच्या व्यथा, वेदना त्या वेगळ्याच असतात. अशा सगळ्या पोलिसांच्या मनातील जाणून घेतलं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी. इतकचं नव्हे तर त्यांनी पोलिसांच्या परिवाराशीही संवाद साधला.
माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचं गाव असलेल्या अकोला शहरात विद्यमान गृहमंत्र्यांचा हा आगळावेगळा संवाद रंगला. गृहराज्यमंत्री झाल्यानंतर पंकज भोयर यांचा हा पहिलाच अकोला दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी अकोला पोलिस दलातील कर्मचारी व त्यांच्या परिवारातील सदस्यांशी सुसंवाद साधला. काहींनी भोयर यांच्या समोर आपलं गाऱ्हाणं मांडलं. तर काहींनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आता पोलिसांच्या या समस्यांवर कोणता औषधोपचार करायचा याचा निर्णय गृहराज्यमंत्री म्हणून डॉ. भोयर यांना घ्यावा लागणार आहे.

कळली ‘मन की बात’
अकोला शहरातील पोलिस लॉन येथे डॉ. भोयर यांनी पोलिसांच्या घरात डोकावण्याचा प्रयत्न केला. खाकी वर्दीमागं एक माणूस असतो. या माणसाच्या मनात सतत घालमेल सुरू असते. ही घालमेल पाहून त्याच्या कुटुंबाची देखील तारेवरची कसरत सुरू असते. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा पास करून आलेले अधिकारी वर्ष दोन वर्षानंतर बदली झाली की निघून जातात. पण मागे राहतात ते तळागाळातील पोलिस आणि त्यांच्या समस्या. या समस्या ते कोणापुढंही मांडू शकत नाही. पोलिसांच्या कुटुंबाच्या मनात दडलेले असे अनेक ‘अनसुने आवाज’ डॉ. भोयर यांनी ऐकून घेतले. पोलिस कुटुंबातील ‘मन की बात’ जाणून घेतली. विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, अकोल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आदी यावेळी उपस्थित होते.
सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर गृहराज्यमंत्री डॉ. भोयर यांनी बऱ्याच समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्याची सूचना केली. मंत्रालयस्तरावरील मुद्द्यांबाबत पुढाकार घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. पोलिसांच्या सोडविणं गरजेचं आहे. त्यावर लवकरच उपाय केले जातील. काही समस्या परीक्षेत्र पातळीवर सोडवाव्या लागतील. त्यासाठी नियोजन करण्याची सूचना डॉ. भोयर यांनी केली. अकोल्यातील पोलिस वसाहतींची अवस्था बिकट आहे. डोक्यावर छत आहे एवढेच काय ते पोलिसांना समाधान आहे. या वसाहतींचा ‘मेकओव्हर’ गरजेचा आहे. नवीन वसाहतीची नितांत गरज आहे. त्याच्या निर्मिती प्रक्रियेला गती मिळेल. सरकार यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देईल, असे डॉ. भोयर यांनी सांगितलं.
दामिनीला गिफ्ट, पण त्याचं काय?
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस विभागात दामिनी पथक नेमण्यात आलं आहे. अकोल्यातील या पथकांना गृहराज्यमंत्र्यांची सरकारतर्फे दुचाकीचं गिफ्ट दिलं. पण या दौऱ्यात अकोल्यातील पोलिस आयुक्तालयाचा मुद्दा मागेच राहिला. मूळ अकोल्याचे रहिवासी असलेले भाजप नेते डॉ. रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री पद मिळालं. मात्र डॉ. पाटील दंगलीचं गाव असलेल्या अकोल्यात पोलिस आयुक्तालय स्थापन करू शकले नाही.
अकोल्यात पोलिस आयुक्तालय स्थापन होईल, असा शब्द डॉ. पाटील यांनी दिला होता. मात्र पेशाने डॉक्टर असलेल्या पाटील यांनी अकोल्याचा पोलिस दलाला ‘व्हेंटिलेटर’वरून काढता आलं नाही. पोलिस आयुक्तालय स्थापन झालंच नाही. आता पुन्हा एकदा योगायोगानं डॉक्टर असलेले पंकज भोयर गृहराज्यमंत्री आहेत. जे पाटलांना जमलं नाही, ते भोयर यांनी अकोलेकरांना द्यावं, अशी अपेक्षाही आता व्यक्त होत आहे.