महाराष्ट्र

Nagpur Riots : मुख्यमंत्र्यांच्या शहरात दंगल, अभिजीत वंजारी संतप्त

Abhijeet Wanjari : ढिसाळ पोलिस प्रशासनामुळे हिंसाचार बळावला

Author

नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराने शहराची शांतता चिरडल्या गेली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कार्यप्रणालीने नागरिकांमध्ये संतापाचा कडेलोट केला आहे. आमदार अभिजीत वंजारी यांनी या गंभीर परिस्थितीवर आक्रमक भूमिका घेत सरकार आणि पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र हल्लाबोल केला आहे.

नागपुरात उसळलेल्या हिंसाचाराने शहराची शांतता भंग केली असून, या घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, पोलिसांच्या आणि सरकारच्या निष्क्रियतेवर कठोर शब्दांत टीका केली आहे. नागपुरात यापूर्वी कधीही अशी गंभीर दंगल घडली नसल्याचे सांगत, त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.

दंगल सुरू असताना पोलिसांचा उशिरा हस्तक्षेप झाल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली, असे वंजारी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या शहरात अशा घटना घडणे अत्यंत लाजिरवाणे असून, सरकारने तातडीने याची दखल घेतली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दंगल कोणत्या परिस्थितीत आणि कोणाच्या आशीर्वादाने उसळली, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

Akola : गोडाऊनच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत 

सत्ताधारी शांत

अभिजीत वंजारी यांनी या संपूर्ण घटनेत प्रशासनाच्या अपयशावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहरात वाढत्या असुरक्षिततेबाबत वारंवार इशारे देऊनही सरकारने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप त्यांनी केला. नागपुरात शांतता राखण्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची असूनही, त्यांनी वेळीच पावले उचलली नाहीत. दंगल सुरू झाल्यानंतर तातडीने पोलिसांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक होते, मात्र प्रत्यक्षात पोलिस घटनास्थळी उशिरा पोहोचले. यामुळे जमावाला मोकळे रान मिळाले आणि तोडफोड, जाळपोळ आणि हल्ल्यांचे प्रमाण वाढले. पोलिसांकडे गुप्तचर विभाग असूनही, अशा प्रकारची हिंसाचाराची शक्यता ओळखली गेली नाही, हे सरकारच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित करते.

 कायदा- सुव्यवस्थेचे अपयश

नागपूर हे राज्याचे महत्त्वाचे शहर असून, येथे मुख्यमंत्री आणि गृहविभागाची विशेष जबाबदारी आहे. असे असताना येथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होणे, हा प्रशासनाचा मोठा अपयशाचा दाखला आहे. वंजारी यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या शहरात जर कायदा-सुव्यवस्था धोक्यात असेल, तर इतर ठिकाणी स्थिती किती बिकट असेल याची कल्पनाच केलेली बरी. दंगलीत अनेक निष्पाप नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक व्यावसायिकांचे दुकानं आणि घरे जाळली गेली, तरी सरकारच्या वतीने कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आले नाही. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, त्यांना सुरक्षेची हमी देणे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना जाहीर झालेली नाही.

Nagpur Riot : आरएसएस मुख्यालय भोवताली परिसरात कडेकोट बंदोबस्त

सखोल चौकशीची गरज 

अभिजीत वंजारी यांनी सरकारकडे ठामपणे मागणी केली आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित केली पाहिजे. सरकार आणि पोलिस प्रशासन जर स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असतील, तर ही गोष्ट अजून गंभीर आहे. नागपुरात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील. दोषींवर कठोर कारवाई करणे आणि नुकसानग्रस्त नागरिकांना भरपाई देणे हे सरकारचे प्राधान्य असले पाहिजे. मात्र, आतापर्यंत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत चालला आहे.

 निर्णय आवश्यक

नागपूरमध्ये उसळलेल्या या हिंसाचाराने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश हे राज्य सरकारसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. अभिजीत वंजारी यांनी या संदर्भात प्रशासनाला आणि सरकारला सुनावले असून, त्वरित निर्णय घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.जर सरकारने त्वरित पावले उचलली नाहीत, तर नागपूरमधील असंतोष आणखी वाढेल आणि प्रशासनाविरुद्ध नागरिकांचा आक्रोश अधिक तीव्र होईल. आता पाहावे लागेल की, सरकार या गंभीर परिस्थितीवर काय निर्णय घेते आणि नागपूरच्या नागरिकांना कायद्यासंमत न्याय कधी मिळतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!