महाराष्ट्र

Akola : वीज खोळंब्याचा कहर, आधी जुने शहर आता जठारपेठचा नंबर 

Randhir Sawarkar : आमदारांचा करंट, अधिकाऱ्यांची लाईन बसली

Share:

Author

अकोल्यातील विजेचा ‘करंट’ वारंवार जातोय, पण जनतेचा संयम मात्र आता पूर्णपणे ‘ओव्हरलोड’ झाला आहे. जठारपेठेत 14 जून रोजी वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे आमदार सावरकरांनी महावितरणला अल्टिमेटम दिला आहे.

अकोला शहरात वीजपुरवठा म्हणजे एक थरारमय वेब सिरीज. एपिसोड कुठे सुरू होईल, केव्हा संपेल, वीजपारे कुठे गायब होतील, याचा पत्ता महावितरणच्या स्क्रिप्ट रायटर अधिकाऱ्यांनाही लागेनासा झालाय. पावसाचे दोन थेंब पडले की इथं लाईन गायब… आणि पाऊस नसला तरीही ट्रिपिंगचं ड्रामा सुरूच. आता एवढं सगळं सहन करूनसुद्धा अकोल्यातील जनतेने संयम सोडला नाही, ही महावितरणसाठी गौरवाची गोष्ट आहे. पण संयमाचा फ्युज अखेर जठारपेठ भागात उडालाच.

14 जून रोजी अकोल्यातील जठारपेठ भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. या प्रकरणात आता अकोला पूर्वचे भाजप आमदार रणधीर सावरकर स्वतः महावितरणच्या करंटबिहीन बैठकीत सामील झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांची शाब्दिक फ्युज फोडली. बैठकीत त्यांनी महावितरणला सहा दिवसांचा ‘वॉर्निंग करंट’ दिला आहे. 20 जून पर्यंत झाडांची छाटणी (Tree Cutting) व संपूर्ण DP मेंटेनन्स पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर, जठारपेठ फीडरसाठी स्वतंत्र वीजपुरवठ्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्याचा निर्णयही झाला.

विजेचा इतिहास

अकोल्यातील जुने शहर म्हटले की, माणसाच्या चेहऱ्यावर येणाऱ्या ‘गडबडलेल्या वीजेच्या आठवणी’ स्वाभाविकच आहेत. लग्न असो वा सण, पाहुणे आले की सर्वात पहिला प्रश्न पडतो, लाईट आहे का? जणू काही लोक दिव्याखाली नव्हे, टॉर्चखाली पाहुणचार करतात. विडंबन तेवढंच , पावसाचा संबंध नसताना देखील वीज गायब होणं म्हणजे, नेटफ्लिक्स सुरू करताच Wi-Fi बंद होणं.

अकोल्यामध्ये इतक्या वर्षांपासून विजेच्या समस्यांवर लोकांनी विद्युत भवनावर मोर्चे, आंदोलनं, निषेध यांचे फुल डोज दिले. पण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नेहमीच डिफॉल्ट रिप्लाय दिला. तो म्हणजे टेक्निकल फॉल्ट आहे…, लाइन अपग्रेड सुरू आहे. याच उत्तराने जनता आता पुरती ओव्हरलोड झाली आहे. सोशल मीडियावर मीम्सपासून ते महावितरण हसवा चॅलेंजपर्यंत सुरू आहेत. पण अद्याप उपायाऐवजी डेडबॅटरीची शांतीच मिळतेय.

Parinay Fuke : आमदारांनी असा मांडला विकासाचा पाढा

समस्येवर तोडगा लवकर काढावा

आतापर्यंत जुने शहर ठीक होतं. परंतु आता या वीज खोळंब्याची नजर जठारपेठ भागावर पडलेली दिसत आहे. जठारपेठ हा नवीन शहराशी जुळलेला एक भाग आहे. येथील नागरिकांनी एका दिवसातच तो अनुभव घेतला, जो अनुभव जुने शहरातील नागरिक कित्येक वर्षांपासून घेत आहेत. विजेच्या या समस्येवरून आमदार सावरकरांनी थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडसावलं. विजेच्या समस्या आता थांबल्या पाहिजेत, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा ही बेजबाबदार व्यवस्थेची लक्षणं आहेत. उपाययोजना झपाट्याने करा, अन्यथा परिणामांना तयार राहा.

नागरिकही करतो विनंती

अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकोला दौरा पार पडला. उपमुख्यमंत्री आले आणि अधिकारी वर्गाला झापून गेले, तरीही काहींवर परिणाम होत नाही, असे आता नागरिकांमधूनच बोलले जात आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना आता नागरिक विनंती करत आहेत. तुमचं कार्य म्हणजे वीज द्यायचं आहे, जनतेला कारणं नाही. घरात दोन AC, चार पंखे, तीन फ्रीज असले तरी, जर वीजच नसेल, तर सगळं सामान केवळ शोपीस ठरतंय.

जनता सांगतेय, आम्ही स्मार्ट मीटर लावले, स्मार्ट मोबाईल घेतले, पण महावितरण मात्र अजूनही ‘बुलंद भारत की बिजली’च्या जाहिरातीतच अडकलेलं दिसतं. जनतेच्या संयमाची परीक्षा आता संपली पाहिजे. जठारपेठचा प्रश्न म्हणजे अकोल्याच्या विकासाच्या मार्गातील एक शॉर्ट सर्किट आहे. आता हा शॉर्ट सर्किट लवकरात लवकर दुरुस्त करा, अन्यथा जनतेचा ‘पॉवर’ मूव्हमेंट कोणत्या अधिकाऱ्याच्या ‘हाऊस’वर केव्हा पडेल काही सांगता येत नाही.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!