
नागपूर शहरात कचऱ्याचे ढिग, तुंबलेली गटारं आणि बेपत्ता अधिकारी… स्वच्छतेच्या नावाने धिंड काढली जातेय. या सर्व गोंधळावर आमदार संदीप जोशी यांनी थेट शब्दांत मनपाच्या कारभारावर घणाघात केला आहे.
नागपूरचं सौंदर्य कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडलं जातंय आणि मनपा प्रशासन अजूनही झोपेत आहे काय? असा घणाघात करत आमदार संदीप जोशी यांनी शहरातील साफसफाई व्यवस्थेच्या बिघडलेल्या चित्रावर रोष व्यक्त करत मनपा प्रशासनाच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला आहे. नागपूरमध्ये सध्या सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. गटारी तुंबल्या, रस्त्यांवर दुर्गंधी, माश्या, डास यांचा हैदोस सुरू आहे. पण आश्चर्य म्हणजे या परिस्थितीतही सात हजारांहून अधिक कर्मचारी असलेली महानगरपालिका बेपत्ता वाटते, अशी टीका करत आमदार संदीप जोशी यांनी स्वच्छतेच्या बिघडलेल्या व्यवस्थेवर थेट कारवाईची मागणी केली आहे.
मनपाकडे सध्या तीन हजार 800 नियमित आणि चार हजार कंत्राटी असे मिळून सुमारे सात हजार कर्मचारी आहेत. पण या संख्येचा उपयोग कुठेच दिसत नाही. झाडाझुडपं, प्लास्टिक कचरा, तुंबलेली गटारी, कुचकुचीत रस्ते… सगळीकडे हीच अवस्था. जोशींच्या मते, ही केवळ कामचुकारपणाची नाही, तर जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या व्यवस्थेची थेट लक्षणं आहेत. सफाई कर्मचाऱ्यांनी आपली ड्युटी ‘सबलेट’ करून ती दुसऱ्यांकडे दिल्याची माहिती त्यांनी दिली. हे कर्मचारी खासगी कामांमध्ये गुंतलेले आहेत. मनपाच्या कोणत्याही झोनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

अधिकारी दिसेनात
रामकृष्ण नगर, धंतोली, बजाज नगर, सुरेंद्रनगर, जागृती कॉलनी अशा अनेक भागांत आमदार संदीप जोशी यांनी अलीकडेच जनसंवाद दौरे घेतले. मात्र या संवादांतून “स्वच्छतेचे वांदे” ही नागरिकांची सगळ्यात मोठी वेदना बनली होती. आमदारांनो, चला दाखवतो तुम्हाला आमचा परिसर, असे म्हणत नागरिकांनी जोशींचा हात धरून थेट कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपाशी नेलं, हे सांगताना खुद्द जोशीही संतापून गेले. गेल्या आठ ते दहा दिवसांत एकदाही झाडू लागलेला नाही, गटारांची सफाई तर वर्षांपासून नाहीच, अशा स्वरूपाच्या तक्रारी सतत ऐकून थकल्यावर जोशींनी अखेर आयुक्तांकडे निवेदन दिले.. स्वच्छ नागपूरचा खरा अर्थच मुळात गायब झालाय, अशी तिव्र भावना जोशी यांनी मांडली.
सिटीत रोज स्वच्छतेच्या नावाने हाय-फाय सादरीकरणं चालतात. पण मैदानात उतरणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या शून्य आहे. फक्त प्रस्ताव पाठवून ड्रेनेजचे काम होत नाही. झाडाझुडपं आणि चोक गटारी यावर वेळेत उपाय झाले नाही, तर पावसाळ्यात नागरिकांच्या त्रासाला काही मोजमापच राहणार नाही. जोशींनी सूचवले की, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून प्रत्येक झोनची पाहणी करावी, सफाई रजिस्टर तपासावं आणि अपयशी जमादारांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी.
Nagpur Political Battle : शहरात चार लाख नव्या मतदारांची एण्ट्री
ठोस कृती
नागपूर हे उपराजधानीचं शहर असूनही स्वच्छतेच्या बाबतीत आज दुय्यम दर्जावर पोचल्याचं चित्र नागरिकांच्या तोंडी आहे. जोशी म्हणतात, “आज नागपूरच्या नागरिकांचा संयम संपत चाललाय. प्रशासनाकडून जर तातडीची आणि ठोस कृती झाली नाही, तर उद्या जनता रस्त्यावर उतरून जबाबदाऱ्यांची सफाई घेईल. रामदास पेठ, देव नगर, फ्रेंड्स कॉलनी, आकार नगर यासारख्या प्रमुख वसाहतीतही हीच दुर्दशा. स्वच्छ भारताचं स्वप्न कचराकुंडीत सडतंय, असं टोमणं मारत, जोशींनी आता शब्दांवर नाही, कृतीवर भर द्या, असा स्पष्ट संदेश दिला आहे.
या एका प्रश्नाने जोशींच्या संपूर्ण निवेदनाचा रोख स्पष्ट होतो. नागपूरला स्वच्छ ठेवायचं असेल, तर फक्त ‘स्वच्छता अभियान’ नव्हे, तर ‘स्वच्छ नियोजन आणि उत्तरदायित्व अभियान’ चालवावं लागेल. जोशींचा रोख फक्त टीकेवर नव्हे, तर ठोस बदल घडवून आणणाऱ्या कृतीवर आहे. आता पाहायचं एवढंच की, नागपूर मनपा झोपेतून जागं होतं का, की जोशींसारखे लोकप्रतिनिधीच झाडू हाती घेऊन रस्त्यावर उतरतात?