
मराठ्यांच्या इतिहासाच्या खुणा मिटवून टाकण्याचा प्रयत्न होऊ शकत नाही. त्या अधिक ठसठशीतपणे जगासमोर मांडल्या गेल्या पाहिजेत, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. औरंगजेबाची कबर हा विजयाचा साक्षीदार आहे. ती हटवण्याऐवजी तिथे मराठ्यांच्या शौर्याचा अभिमान सांगणारा फलक लावावा, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
औरंगजेबाच्या कबरीचा विषय राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. काही हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवरील मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कबरी हटवण्याच्या मागणीला उत्तर देत इतिहासाचे धडे दिले.
मराठ्यांच्या शौर्याच्या खुणा मिटवून टाकणे शक्य नाही, त्या नष्ट करून चालणारही नाहीत. त्या उलट अधिक ठसठशीतपणे जगासमोर मांडल्या गेल्या पाहिजेत. औरंगजेबाची सजवलेली कबर हटवावी आणि त्या ठिकाणी एक फलक लावावा, जिथे स्पष्ट लिहिले असेल की, आम्हा मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला औरंगजेब आम्ही इथे गाडला आहे. अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे.

चुकीचा अर्थ लावू नका
राज ठाकरे म्हणाले, आत्ता कुठून आठवला औरंगजेब? एखादा चित्रपट पाहिल्यावर अचानक हिंदुत्व आठवते का? मग त्या चित्रपटाने छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्यही आठवले पाहिजे ना? सध्या अनेक जण विधानसभेत इतिहासावर चर्चा करतात. पण त्यांना इतिहासाची खरी माहिती आहे का? औरंगजेबाचा जन्म गुजरातच्या दाहोदमध्ये झाला. मग त्यावरून जातीय तेढ निर्माण करून भांडणं लावण्याचा हा प्रयत्न आहे. या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची किंमत माहीत नाही. ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हिंद प्रांतात एक महान स्वप्न पाहिलं होतं जिजाऊंनी आणि त्यांचं हे स्वप्न शिवरायांनी प्रत्यक्षात उतरवलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंद प्रांतावर झालेला संस्कार आहे. हा केवळ इतिहास नाही, तर एक विचार आहे, आणि तो कायमस्वरूपी राहणार आहे.
Chandrapur : राजकीय दुर्लक्षामुळे वर्धा-वैनगंगा मृत्यूपंथाला
विचार संपवायचा होता
औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेचा उल्लेख करताना राज ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले. राज्याभिषेक झाला आणि 1680 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर औरंगजेबाचा मुलगा दक्षिणेत आला. संभाजी महाराजांनी त्याला आसरा दिला. पण औरंगजेब मात्र 1681 मध्ये दक्षिणेत दाखल झाला. पुढील 27 वर्ष तो मराठ्यांविरुद्ध झगडत राहिला. संभाजीराजे, राजाराम महाराज, संताजी-धनाजी, ताराराणीसाहेब यांनी त्याच्या विरुद्ध लढा दिला. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहता, मराठ्यांनी युद्ध हरली. पण औरंगजेब एकही युद्ध जिंकू शकला नाही. राज ठाकरे पुढे म्हणाले, औरंगजेबाला केवळ राज्य जिंकायचं नव्हतं, त्याला शिवाजी महाराजांचा विचार संपवायचा होता. त्यासाठी तो इथे ठाण मांडून बसला, पण अखेर याच भूमीत मराठ्यांनी त्याचा शेवट केला. म्हणूनच आपण या ठिकाणी अभिमानाने सांगितले पाहिजे की, आम्ही आमच्या भूमीत शत्रूला संपवले.
खरा इतिहास मिळवा
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी इतिहासाच्या दृष्टिकोनातून मोठा मुद्दा मांडला. अफजलखानाला मारले आणि त्यालाच तिथे पुरले. कारण भविष्यात लोकांनी हे पाहावे आणि शिकावे की, या भूमीत कोणाचा अंत झाला. मग औरंगजेबाच्या बाबतीत वेगळं का करायचं? मराठ्यांनी कोणाकोणाला गाडलं आहे, हे जगाला ठसवून सांगायला हवं. आमच्या पुढच्या पिढ्यांनी या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यावी. त्यांना माहिती मिळावी की, हा औरंगजेब मराठ्यांविरुद्ध युद्ध लढण्यासाठी आला होता आणि याच ठिकाणी तो गाडला गेला.
तरुणांना आवाहन करत राज ठाकरे म्हणाले की, इतिहास व्हॉट्सअपवर वाचू नका. तुम्हाला चुकीच्या दिशेने नेणारा, जातीपातीच्या नावाखाली भेदभाव वाढवणारा खोटा इतिहास दिला जातो. त्या मागे कोणाचातरी राजकीय स्वार्थ असतो. त्यामुळे इतिहास योग्य संदर्भांसह समजून घ्या. मराठी शौर्याच्या खुणा कधीही पुसल्या जाणार नाहीत, त्या अधिक ठळक करून जतन करायच्या आहेत, असा ठाम निर्धार राज ठाकरे यांनी या भाषणातून व्यक्त केला.