भाजप कार्यकर्त्याने राज ठाकरे यांच्यावर टीका करताच, मनसेने शब्दांचे गुलाल नाही, तर थेट सडेतोड प्रत्युत्तर उधळले. धुळवडीच्या दिवशी रंगांचा नव्हे, तर राजकीय वादांचा फटकारा पहायला मिळाला.
होळीचा सण म्हणजे रंगांचा उत्सव. स्नेह, उत्साह आणि आनंदाने न्हालेल्या या दिवशी सगळे गोडधोड करून दुःख विसरतात. धुळवडीला रंगांची उधळण होते, पण महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र आरोप-प्रत्यारोपांचे रंग उधळले जातात. यंदा धुळवडीच्या दिवशी राजकीय रंग काहीसे गडदच झाले. भारतीय जनता पक्षाचे नेते कृपाशंकर सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका करताच, मनसेनेही तितक्याच जोरदार शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत त्यांना ‘भांग पिऊन बोलणारे’ असे संबोधले. ‘राज ठाकरे काय बोलतात हे त्यांनाच ठाऊक नसते. कधी काय बोलायचं, उद्या काय बोलायचं हेही त्यांना समजत नाही. मला वाटतं ते सकाळी उठून भांग घेतात आणि मस्त राहतात,’ असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. यावरच न थांबता त्यांनी पुढे आणखी खोचकपणे म्हणाले, ‘संध्याकाळी राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलावतात माझ्या बांधवानो, काहीतरी करा. पण ते स्वतः काय करत असतात याचा त्यांनाच पत्ता नसतो. मी त्यांच्यासाठी भांगच पाठवतो.’
मनसेचा संताप
भाजप नेत्याच्या या वक्तव्यामुळे मनसे आक्रमक झाली. पक्षाचे नेते अमेय खोपकर यांनी सिंग यांना कडवट प्रत्युत्तर दिले. ‘तुमची लायकी नाही राजसाहेबांवर टीका करण्याची. जो कोणी वैयक्तिक टीका करेल, त्याच्या कानाखाली आवाज निघेल, असा थेट इशारा त्यांनी दिला.
कृपाशंकर सिंग यांना ‘फेरीवाला’ संबोधत टोला लगावला. ‘आज एका पक्षात, उद्या दुसऱ्या पक्षात अशी भटकंती करणाऱ्या लोकांनी राज ठाकरेंवर बोलू नये. महाराष्ट्र धुळवड साजरी करत असताना काही लोक मात्र गलिच्छ राजकारण करतात. पण आम्ही त्यांना सोडणार नाही,’ असा स्पष्ट इशारा खोपकरांनी दिला.
Nana Patole : रंग बदलाल तर मुख्यमंत्री व्हाल; शिंदे-पवारांना ऑफर
राजकीय उधळण
होळी आणि धुळवड म्हणजे माणसांना जवळ आणणारे सण, पण महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर मात्र कटुता दिसून आली. सोशल मीडियावरही या वादाला मोठा प्रतिसाद मिळाला. मनसैनिकांनी ट्विटर आणि फेसबुकवर कृपाशंकर सिंग यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
