
नरेंद्र मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या गैरवापराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबई दादर येथे रमेश चेन्नीथला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी अडकले आहेत. ईडीने यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रावरून काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र टीका केली आहे. ईडी सीबीआयचा वापर करून काँग्रेसचा आवाज दाबता येणार नाही, असा ठाम इशारा पक्ष प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिला आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी नऊ एप्रिल रोजी दाखल झालेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे.
पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मोदी सरकारच्या कारवाई विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दादरमधील इंडिया बुल्स कार्यालयाजवळ जोरदार आंदोलन छेडले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. या वेळी विधिमंडळातील काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, माजी अध्यक्ष नाना पटोले, चंद्रकांत हंडोरे, रजनीताई पाटील, आणि अन्य अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Congress : सपकाळांच्या दौऱ्यानंतर जिल्हा समित्या बरखास्त करण्याची मागणी
जुन्या चेहऱ्याचा पक्षप्रवेश
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले, मात्र नंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने मोदी सरकारच्या तानाशाही वृत्तीचा निषेध नोंदवला आहे. काँग्रेसच्या आंदोलनात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या काळात झालेल्या निलंबनानंतर ही त्यांची पक्षात पुनरागमनाची घोषणा झाली. सोबतच आम आदमी पक्षाचे प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महायुती सरकारवर निशाणा साधताना चेन्नीथला म्हणाले की, लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2 हजार 100 रुपयांचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आता प्रत्यक्षात फक्त 500 रुपये दिले जात आहेत. महायुती सरकार जनतेचा विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने पूर्वीच या योजनेविषयी शंका व्यक्त केली होती. आज त्या शंका खऱ्या ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या महायुती सरकारविरोधात काँग्रेस ठाम भूमिका घेणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
दडपशाहीचा विरोध
पत्रकार परिषदेत बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीची कारवाई ही केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहे. अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष घाबरणार नाही. उलट अधिक जोमाने लढा उभारेल. महाराष्ट्रासह देशभरातील आंदोलनांनी याची प्रचिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ ईडी वा सीबीआयच्या कारवायांची प्रतिक्रिया नाही, तर जनतेच्या विश्वासाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा लढा आहे, असे सांगत चेन्नीथला यांनी आगामी काळात भाजप सरकारविरोधात अधिक तीव्र आंदोलनाची भूमिका जाहीर केली.