
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उठली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत पाकिस्तानविरोधी ठाम लष्करी कारवाईची आवश्यकता व्यक्त केली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचे बळी गेल्यानंतर संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या क्रूर घटनेमुळे भारतभरातील जनतेच्या मनात शोक आणि रोष यांचे अनोखे मिश्रण पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या या सततच्या आक्रमक आणि विघातक वृत्तीविरोधात आवाज चढू लागला आहे. देशभरातून लष्करी कारवाईची मागणी तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या ठाम आणि प्रगल्भ शैलीत या विषयावर आपली परखड भूमिका मांडली.
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, जगात एकच धर्म आहे तो म्हणजे मानवधर्म आणि तोच खरा हिंदू धर्म आहे. आपल्या सैनिकांनी किंवा देशवासीयांनी कधीच कोणाच्या धर्मावरून हिंसा केली नाही. पण काही कट्टरपंथीय लोक आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ काढतात आणि अशा भीषण घटनांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे देशाने ताकदवान असणं गरजेचं आहे. शक्तिशाली राष्ट्रच शांतता राखू शकतं.

निर्दालनाची आवश्यकता
हल्ल्यानंतर देशातील लोकांच्या मनात असलेल्या वेदनेला आणि संतापाला मूर्त स्वरूप देत भागवत म्हणाले, आपल्या मनात दुःख आहे आणि रोषही आहे. तो असलाच पाहिजे. जे दुष्ट आहेत, त्यांचं निर्दालन अपरिहार्य आहे. रावणाचं उदाहरण समोर आहे. तो शिवभक्त होता, वेदांचा जाणकार होता, पण त्याच्या मनातील वाईटपणा कधीच गेला नाही. अशा व्यक्तीचं रूपांतर केवळ त्याच्या नाशानेच शक्य होतं.
Parinay Fuke : महत्त्वाच्या समित्यांमध्ये भाजप आमदाराची डबल भूमिका
भागवत यांनी यावेळी भारताच्या सहनशीलतेचा संदर्भ देताना म्हटले की, द्वेष आणि शत्रुत्व ही आपल्या संस्कृतीचा भाग नाही. पण त्याचवेळी मार खाणं हाही आपला स्वभाव नाही. जो दुर्बल असतो, त्याला नाईलाजाने अहिंसक रहावं लागतं. पण जो बलवान असतो, त्यानेच खरी अहिंसा जोपासावी. म्हणूनच शक्ती असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती शक्ती जगाला दिसली पाहिजे.
पाकिस्तानकडून सतत पुन्हा पुन्हा उगाळलं जाणारं द्विराष्ट्रवादाचं षड्यंत्र अधोरेखित करत भागवत म्हणाले, 75 वर्षांनंतरही पाकिस्तानचे नेते अजूनही द्विराष्ट्र सिद्धांतावर भाष्य करत आहेत. याचा अर्थ त्यांनी काहीच शिकलं नाही. मात्र, आपल्याला या सगळ्या प्रकरणाकडे फक्त भावनांनी नव्हे तर तत्त्वज्ञानाच्या, नीतीच्या आणि शक्तीच्या आधारावर पाहावं लागेल. ते पुढे म्हणाले, संपूर्ण विश्व हे एक कुटुंब आहे. कोणताही धर्म, संप्रदाय शेवटी माणसाला एका सार्वत्रिक सत्याकडे घेऊन जातो. पण काही लोक आहेत, जे सुधरत नाहीत, अशा दुष्ट शक्तींचा नाश होणं आवश्यक असतं. त्यामुळे शक्ती ही आवश्यक आणि उघड असावी लागते.