महाराष्ट्र

आईला निरोप देताना ढसाढसा रडले प्रदेशाध्यक्ष Nana Patole 

भंडारा जिल्ह्यातील सुकळी येथे अंत्यसंस्कार 

Share:

Author

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, ही म्हण आपण ऐकली असेल. याची प्रचिती लोकांना पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यामध्ये आली. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पाटोले यांच्या मातोश्री मिराबाई यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. मिराबाई यांच्या पार्थिवावर भंडारा जिल्ह्यातील सुकळी गाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या आईचे पार्थिव पाहून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भावनिक झाले होते. आईच्या पाठीवर डोकं ठेवल्यानंतर नाना पटोले हे ढसाढसा रडले.

राजकारणामध्ये कणखर नेतृत्व म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांना असे रडताना पाहून अनेकांचा कंठ दाटून आला. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या सगळ्यांनीच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई यांच्या अंत्यसंस्कारासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी मिराबाई यांना श्रद्धांजली वाहिली.

आई सोबतच्या आठवणी

अंत्यसंस्काराच्या वेळी नाना पटोले हे आपल्या आई संदर्भातील आठवणी अनेकांना क्षमतांना दिसले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी नाना पटोले यांनी आपल्या आईचे आवर्जून आशीर्वाद घेतले होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देखील पटोले यांनी आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले. त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रविवारी (29 डिसेंबर) पहाटे नागपूर येथे वृद्धापकाळानं मिराबाई पटोले यांचे निधन झालं.

मिराबाई यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी माजी मंत्री तथा भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके, भंडारा गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील अनेक नेते, राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. विजय वडेट्टीवार यांनी मीराबाई पटोले यांना श्रद्धांजली वाहिली. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब पटोले कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की नाना पटोले आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, असे वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील मीराबाई पटोले यांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील सोशल मीडियावर मिराबाई पटोले यांचा फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. मिराबाई पटोले यांच्या पार्थिवावर भंडाऱ्याच्या सुकळी या स्वगावी चुलबंद नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिराबाई यांच्या निधनामुळे भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावावर शोककळा पसरली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हे मूळ गाव आहे. त्यामुळे ग्रामीण परंपरेनुसार मीराबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. नाना पटोले यांच्यासह त्यांचे भाऊ देखील यावेळी हजर होते. राज्यातील अनेक नेत्यांनी मीराबाई पटोले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!