महाराष्ट्र

Jayshree Shelke : विद्यार्थ्यांच्या लढ्याला उद्धव ठाकरे गटाचा पाठिंबा

Maharashtra : एमपीएससी लिपीक-टंकलेखक निकालाचा पत्ता नाही

Author

महाराष्ट्रातील 2023 मधील एमपीएससी लिपीक-टंकलेखक परीक्षेचा निकाल दोन वर्षांपासून निघाला नाही, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू आहे.

दोन वर्षे झाली, अजूनही निकाल कुठे आहे? हा प्रश्न महाराष्ट्रातील हजारो एमपीएससी लिपीक-टंकलेखक परीक्षार्थ्यांच्या मनात ठाण मांडून बसला आहे. 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र संयुक्त गट-क लिपीक-टंकलेखक परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आता अखंड धैर्याची कसोटी ठरू लागली आहे. आयोगाकडून वेळोवेळी केवळ तारीख पे तारीख  दिली जात असून विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाला आपला ठाम पाठिंबा दर्शवत, न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहू, असा रोखठोक इशारा दिला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 2023 मध्ये तब्बल 7 हजार 6 पदांसाठी लिपीक-टंकलेखक भरती प्रक्रिया सुरू केली होती. हजारो विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या कष्टातून या स्पर्धा परीक्षेत सहभाग घेतला. मात्र, निकालाच्या प्रतिक्षेत विद्यार्थ्यांचे आयुष्य अडकून पडले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच जयश्री शेळके यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडल्या. प्रत्येकाची एकच मागणी निकाल जाहीर करा.

Maharashtra : शिवभोजन थाळी उपासमारीच्या उंबरठ्यावर 

आयोगावर दबाव

आयोगाने याआधीच जाहीर केले होते की जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निकाल जाहीर केला जाईल. मात्र आता ही तारीख पुढे ढकलत जून अखेरपर्यंत अशी नवी वेळसंधी देण्यात आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम अधिकच वाढला आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे आणि आयोगाच्या विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे करिअर अंधारात ढकलले जात आहे. दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुलांना कुठे जायचं? असा सवाल आता त्यांच्या पालकांनाही सतावू लागला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जयश्री शेळके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, विद्यार्थ्यांच्या हक्काचा हा लढा आहे. त्यांच्या पाठीशी शिवसेना ठाम उभी आहे.

निकाल लवकर जाहीर झाला नाही, तर आंदोलन उभारल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यांनी राज्य शासन आणि एमपीएससी प्रशासनाला देखील खडसावले. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ मांडू नका. निकाल जाहीर करा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा देतो. विद्यार्थ्यांनी सर्वस्व पणाला लावून ही परीक्षा दिली. आता मात्र त्यांच्या संयमाचा कडा उलगडत चालला आहे. सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये एकच प्रश्न आहे शेवटी निकाल कधी? आता पाहावं लागेल, आयोग या आंदोलनाच्या सूराला कितपत प्रतिसाद देतो आणि प्रतिक्षेच्या या दीर्घ संघर्षाला न्याय मिळतो का?

Bacchu Kadu : अंत्ययात्रा निघाली तरी चालेल पण मागे हटणार नाही

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!