
महाराष्ट्र एसटी महामंडळाने आर्थिक तुटवड्याचे कारण देत कर्मचाऱ्यांना अर्धवट मार्च महिन्याचा पगार दिला आहे. यावर आता विरोधक आक्रमक झाले आहेत.
येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळात प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सणवार यामुळे एसटी बसेस भरून वाहतील. मात्र, याच काळात प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक वाहकांना त्यांच्या वेतनाची चिंता भेडसावत आहे. मार्च महिन्याचा फक्त निम्माच पगार त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. उर्वरित रकमेबाबत कोणतीही स्पष्टता नाही. महामंडळाकडे निधीची टंचाई असल्याने हा निर्णय घेतला गेला आहे.
एसटी महामंडळातील 87 हजार कर्मचाऱ्यांना फक्त 56 टक्केच वेतन मिळाले आहे. महामंडळाने आर्थिक तंगीचे कारण देत हा निर्णय घेतला आहे. उर्वरित रक्कम कधी मिळणार याबाबतही कोणतीही खात्री दिलेली नाही. त्यामुळे एसटी कामगार संघटनांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. महामंडळाने एसटी बँकेला कर्मचाऱ्यांच्या कर्जफेडीसाठी तब्बल 40 कोटी रुपये द्यावे लागले, त्यामुळे वेतनासाठी निधी उरलेला नाही. यावरून आर विरोधक आक्रमक झाले आहेत.

काँग्रेसचा हल्लाबोल
वेतन न मिळाल्याने आता काँग्रेकडून यावर हल्लाबोल करण्यात येत आहे. एसटी कर्मचारी सरकारचे लाडके नाहीत का? असा प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवर विजय वडेट्टिवार यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, एसटी कर्मचाऱ्यांनी काम शंभर टक्के करायचं, पण त्यांना पगार मिळणार फक्त 56 टक्केच का? मग एसटी कर्मचारी सरकारचे लाडके नाहीत का.
एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सरकारच्या मदतीने दिला जातो. दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत वेतन खात्यात जमा केले जाते. मात्र, यावेळी निधीच्या टंचाईमुळे फक्त 56 टक्के वेतनच देण्यात आले. विशेष म्हणजे, अप्रेंटिस आणि निवृत्त अधिकाऱ्यांना मात्र पूर्ण पगार मिळाला. पण चालक-वाहक आणि सुरक्षा रक्षक यांना अनुक्रमे फक्त 56 टक्के आणि 50 टक्केच पगार मिळाला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. एसटीतील 80 टक्के कर्मचारी विविध कर्जांखाली दबले आहेत.
आर्थिक अडचणी
पगार वेळेवर न मिळाल्याने कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. याशिवाय, घरखर्च, मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा कशा भागवायच्या, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, उष्णतेच्या लाटेत 40 ते 42 अंशांच्या उन्हात प्रवासी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 15 एप्रिलला सकाळी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांची बैठक होणार आहे. या बैठकीत वेतनाचा निर्णय होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारला यासाठी जबाबदार धरले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही विरोधकांनी तर महामंडळाचे वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी यांना तुरुंगात टाका, अशी मागणी केली होती.