
नागपूरमध्ये आयोजित व्याख्यानात प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिमांना सतत व्हिलनच्या भूमिकेत बसवण्यावर टीका करत भारतीय समाजाला भूमिका बदलण्याचा इशारा दिला.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील मुस्लिमांना सतत ‘व्हिलन’च्या भूमिकेत का बसवले जाते? हा सवाल रविवारी (29 जून रोजी) संघाच्या भूमीवर (नागपूर) थेट उचलला तो वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी. भारतीय मुस्लिम आणि पाकिस्तानातील मुस्लिम यांच्यात जमीन-आसमानाचा फरक आहे. पण तो मुद्दाम दुर्लक्षित केला जातो, असे परखड वक्तव्य त्यांनी केले. कस्तुरचंद पार्कजवळील परवाना भवनमध्ये आयोजित ‘ऑपरेशन सिंदूर आणि नंतरच्या घडामोडी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. फुले-आंबेडकर इंटलेक्च्युअल फोरमतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
व्याख्यानात त्यांनी देशाच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय वास्तवावर थेट बोट ठेवले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील धर्मांध शक्ती मुस्लिमांबद्दल भीती आणि शंका पेरत आल्या. त्यांच्या संदर्भात, ‘हे लोक भविष्यात आपल्या छातीवर बसतील’ असा प्रचार सातत्याने केला जातोय, अशी टीका अॅड. आंबेडकर यांनी केली. आजही देशातील सनातनी विचारांची सत्ता मुस्लिमांना संशयाच्या कटघऱ्यात उभी करत आहे. पण या भूमिकेतून सुटका करायची तयारी कोणी दाखवत नाही, असे त्यांनी ठणकावले. त्यांच्या मते, भारतातील मुस्लिमांमध्ये संत परंपरा आहे. जी पाकिस्तानमध्ये अजिबात नाही. हा महत्त्वाचा फरक समाजासमोर ठळकपणे मांडण्याऐवजी, मुसलमानांना सतत दुय्यम आणि संशयित नागरिक म्हणून बघितले जाते.

ऐतिहासिक पराभवाची कारणे
आंबेडकर यांनी स्पष्ट इशारा दिला की, या धार्मिक ध्रुवीकरणाच्या रेषा अजून खोल जात आहेत. जर वेळीच भूमिका बदलली नाही, तर या भेगा भगदाडात रूपांतरित होतील आणि समाजात अराजक माजण्याचा धोका निर्माण होईल. ते पुढे म्हणाले, सध्याचे राजकारण हे देशापेक्षा वैयक्तिक स्वार्थावर चालते. गुळगुळीत राजकीय बोलण्याच्या बाहुल्यात देश अडकला आहे. देशाच्या प्रगतीपेक्षा, स्वतःचे महत्त्व कसे वाढेल याकडेच नेत्यांचा अधिक कल आहे. या व्याख्यानात आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकसभा पराभवामागील ऐतिहासिक घटनांचा धांडोळा घेतला. पाकिस्तान आणि काश्मीरचा प्रश्न भविष्यात देशासाठी रक्तरंजित ठरेल हे बाबासाहेबांनी खूप आधी ओळखले होते, असे त्यांनी नमूद केले.
Bhushan Gawai : आंबेडकरांच्या नीतीत बसत नव्हते 370 कलमचे पान
बाबासाहेबांनी ‘काश्मीर घ्या किंवा कायमचे पाणी सोडा’ असे स्पष्ट मत मांडले होते. मात्र त्याकाळी काँग्रेस, डावे आणि हिंदू महासभेने त्याला विरोध केला. त्यावेळच्या पंतप्रधानांनी काश्मीरचा मुद्दा थेट संयुक्त राष्ट्रात नेला. त्यामुळेच आजही हा प्रश्न अधिकच चिघळलेला आहे. देश पुन्हा पुन्हा दहशतवादी हल्ल्यांनी रक्तबंबाळ होतोय, आणि या अराजकाचे समाधान कधी होईल याची अजिबात खात्री देता येत नाही, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली.अखेरीस प्रकाश आंबेडकर यांनी समाजाला आवाहन केले की, धर्माच्या नावावर चालणाऱ्या राजकारणाला थांबवा. भारतीय मुस्लिमांबद्दलची भूमिका बदलली तरच देशाची खरी प्रगती शक्य आहे. अन्यथा या देशातील फाटलेले सांस्कृतिक धागे पुन्हा जुळणे अत्यंत कठीण होईल.