
महापालिकेच्या हलगर्जीपणावर भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. नागपूर शहरातील समस्यांवर त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या राजकीय रंगमंचावर हालचालींना वेग आला आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या आमदारांनीच आता शहरातील समस्यांचा मुद्दा घेत महापालिकेच्या प्रशासकांविरोधात रणशिंग फुंकले आहे. विशेष म्हणजे, भाजप राज्यात सत्तेवर असून देखील नागपूर महापालिकेत तीन वेळा सलग सत्ता भोगलेल्या पक्षालाच नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
आमदार प्रवीण दटके यांनी नागनदीच्या स्वच्छतेवरून प्रशासनावर कडाडून टीका केली. त्यानंतर शुक्रवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात थेट महापालिकेविरुद्ध आंदोलन छेडण्यात आले. नागपूरकरांच्या व्यथा, परिसरातील बेफिकिरी, आणि वाढत्या असुविधा यामुळे संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

उद्यानातील झगमगाटाची प्रतीक्षा
पूर्व नागपूरातील शास्त्रीनगर उद्यानाची स्थिती दयनीय बनली आहे. येथे मागील अनेक महिन्यांपासून दिवे बसवण्याची आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही हालचाल झाली नाही. माजी स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांनी हे स्पष्ट केले.
याच प्रभागातील कुंभारटोली परिसरात नागनदीच्या काठावर सुरक्षा भिंत बांधण्याचा आदेश महापालिकेने जवळपास वर्षभरापूर्वी दिला होता. परंतु अद्याप त्या बांधकामाची सुरुवातही झालेली नाही. या विलंबामुळे पावसाळ्यात परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे. आदर्शनगर झोपडपट्टीतही नाल्याच्या काठावर सुरक्षा भिंतीची नितांत गरज आहे. पावसाळ्यात येथे पाणी शिरल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Parinay Fuke : महाराष्ट्राला जापान सारखं करण्यासाठी असा घडला दोन नेत्यांचा संवाद
नागरिकांची निराशा
भारत माता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दररोज शेकडो नागरिक सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी येतात. मात्र या उद्यानांच्या देखभालीकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. वॉकिंग ट्रॅकवरील कोटा जुना व घासलेला झाला असून पावसाळ्यात त्यावर पाणी साचते. त्यामुळे नागरिक घसरून पडतात आणि दुखापत होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे येथे नवीन ट्रॅकचे बांधकाम करणे अत्यावश्यक बनले आहे.
उद्यानातील प्रसाधनगृह आणि शौचालये बंद असल्याने नागरिक, विशेषतः महिलांना आणि वयोवृद्धांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नवीन आणि सुसज्ज प्रसाधनगृहाची व्यवस्था तातडीने करण्याची मागणीही आंदोलनादरम्यान जोरात झाली.
नागनदी स्वच्छतेचे केवळ ‘नाटक’
महापालिकेने नागनदीची स्वच्छता करण्याचा देखावा केला. प्रत्यक्षात नदीतून फक्त वरच्या थरातील घाण काढण्यात आली. नदीचे मूळ गाळ, सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा तसाच शिल्लक असून स्वच्छतेच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल केली गेली. या कृतीवर आमदार प्रवीण दटके यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी नदी स्वच्छतेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून प्रशासनावरील अविश्वास व्यक्त केला.