
हर्षवर्धन सपकाळ यांच्या नागपूर दौऱ्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. प्रदेश सचिव खान नायडू यांनी राज्यातील सर्व जिल्हा आणि प्रादेशिक काँग्रेस समित्या बरखास्त करण्याची मागणी केली आहे.
उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. नुकत्याच 16 एप्रिल रोजी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरचा दौरा केला. या दौऱ्यावेळी नागपूरमध्ये सद्भावना मार्चचे आयोजन करण्यात आले होते. शहरात शांततेचा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या मार्चने काँग्रेसच्या पुढील रणनीतीला दिशा दिली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी मागणी पुढे केली आहे. राज्यातील सर्व जिल्हा आणि प्रदेश काँग्रेस समित्या बरखास्त करून नवीन, तरुण नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भूमिका आता समोर येत आहे.
नागपूरमधून केलेल्या या मागणीमुळे राज्यातील काँग्रेसमध्ये नव्या युगाची नांदी होणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं होतं. जिल्हा पातळीवरील नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, असं सूतोवाच त्यांनी केलं. त्यानंतर या विधानाचा प्रतिध्वनी महाराष्ट्रातही ऐकू येऊ लागला आहे. विशेषतः नागपूरमधून याची सुरूवात झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव खान नायडू यांनी ही मागणी केली आहे.

राहुल गांधींना पत्र
मागणीस अधिकृत स्वरूप देण्यासाठी खान नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात केवळ नवीन नेतृत्वाचाच नव्हे, तर विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. खान नायडू यांनी आपल्या पत्रात मुस्लीम, आदिवासी आणि बौद्ध समाजाच्या तरुणांसाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा आणि प्रदेश पातळीवर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये तरुणांना आणण्याची शिफारस त्यांनी केली आहे. त्यांच्या मते, काँग्रेसचे जुने नेतृत्व हे अनेक वर्षांपासूनच कार्यरत आहेत.
आता परिवर्तनाची वेळ आली आहे. मात्र, नव्या नेतृत्वाला संधी देण्याच्या या मागणीसोबतच काँग्रेसमध्ये गटबाजीचं सावट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातच अंतर्गत गट तयार होतील आणि यामुळे संघटनात्मक एकता धोक्यात येईल, असा अंदाज काहींनी वर्तवला आहे. या चर्चांवर प्रतिक्रिया देताना खान नायडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ही कुठल्याही प्रकारची गटबाजी नाही. आम्ही कुणाचेही नाव घेत नाही. हा पक्षहिताचा मुद्दा आहे. एकूणच काँग्रेसच्या नव्या वाटचालीसाठी आवश्यक असा विचार आहे.
नव्या संधीची ही मागणी फक्त नागपूरपुरती मर्यादित राहणार का, की याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. एक मात्र स्पष्ट आहे.. काँग्रेसमध्ये आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार गंभीरपणे होत आहे. ज्याची सुरुवात नागपूर मधून होत आहे.