
नागपूरच्या दिव्या देशमुख हिने जागतिक क्रमांक एक खेळाडू होउ यिफानचा पराभव करून भारतासाठी ऐतिहासिक विजय मिळवला.
नागपूरच्या मातीतून उगम पावलेली एक नव्या भारताची शेरनी WGM दिव्या देशमुख. सध्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ विश्वात वादळ घालत आहे. लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या World Team Blitz Championship उपांत्यफेरीत तिने एक अनपेक्षित परंतु डोळे विस्फारायला लावणारी खेळी केली. जगातील क्रमांक एक महिला बुद्धिबळपटू होउ यिफान हिला हरवून दिव्याने केवळ बोर्डवर नाही, तर जगभराच्या स्पर्धकांच्या मनावर राज्य केलं आहे. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिव्याचे अभिनंदन करत म्हटले की, ही विजयगाथा नवोदित बुद्धिबळपटूंना नवा आत्मविश्वास देणारी आहे.या विजयावर केवळ देशाचेच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय पटावरही लाट उठली आहे. राज्याचे सडेतोड, रणनीतीकार नेते आणि माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिव्याच्या खेळावर शाबासकीची थाप दिली आहे. डॉ. फुके म्हणाले, ‘जिद्द, आत्मविश्वास आणि प्रतिभेचे’ हे देखणं उदाहरण आहे. दिव्या देशमुख हिचा ऐतिहासिक विजय संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद आहे.

Yashomati Thakur : सत्ताधाऱ्यांच्या शाळांमध्ये शिक्षक घोटाळ्यांचे धडे
समाजपरिवर्तनाचे सकारात्मक पाऊल
डॉ. परिणय फुके यांचा बुद्धिबळ आणि राजकारण यामधला ‘कॉमन ग्राउंड’ही नेहमी लक्षवेधी ठरतो. काही आठवड्यांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या FIDE Women’s Grand Prix 2025 जगप्रसिद्ध बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन त्यांच्या उपस्थितीत पार पडले. यातच दिव्याने मिळवलं होतं तिसरं स्थान 5.5 गुणांसह. महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या पुढाकाराने पार पडलेल्या या स्पर्धेतील प्रमुख यशस्वी स्पर्धक दिव्या देशमुख ठरली. तिच्या संयमी आणि आक्रमक खेळीमुळे तिने महाराष्ट्रचं आणि भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पटलावर उंचावलं.
दिव्या देशमुख आता जागतिक स्पर्धेच्या दारात उभी आहे. राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असलेल्या डॉ. फुके यांनी या बुद्धिबळ युद्धात आपली चतुर चाल खेळली आहे. एका बाजूला भाजपची राजकीय समीकरणं आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील बुद्धिबळ खेळाडूंना दिलेला व्यासपीठ ही त्यांची ‘डबल गेम’ चाल राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते.सध्याचे राजकारणी जेव्हा फेसबुक लाईव्ह, रॅली आणि भाषणात अडकून पडले असतात, तेव्हा डॉ. परिणय फुके थेट बुद्धिबळाच्या पटावरून समाजपरिवर्तनाचे ‘पॉजिटिव्ह पावले’ टाकत असतात.
डॉ. फुके यांच्या पुढाकारामुळे बुद्धिबळ सारख्या शांत खेळालाही नवचैतन्य लाभले आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील नवोदित खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठ मिळण्याची आशा वाढली आहे.दिव्या देशमुख हिच्या यशात जसे तिचे कष्ट, तसेच तिच्या मागे उभ्या असलेल्या समर्पित संस्थांचीही भूमिका आहे. त्या संस्थांना राजकीय मदत मिळाल्यामुळेच आज महाराष्ट्रातून अशा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय मानांकन गाठलं आहे.