
नागपूरमध्ये बोगस शिक्षण घोटाळ्यात मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचा वापर करून बोगस शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
राज्याच्या उपराजधानी नागपुरात शिक्षण क्षेत्राला हादरवणारा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. नागपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बनावट नियुक्ती झाल्याचे समोर आले आल्याने या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची दखल स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली असून, त्यांनी पोलिसांना तातडीने कसून चौकशीचे आदेश दिले आहेत. एका मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचा दुरुपयोग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बनावट नियुक्त्यांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक बोजा पडला आहे. लाखो रुपयांचे वेतन हे बोगस कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, सरकारी यंत्रणांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिक्षण विभागानेही या प्रकाराला दुजोरा दिला आहे. या घोटाळ्याच्या आणखी धक्कादायक बाजू समोर येत आहेत. सोमेश्वर नैताम नावाचे शिक्षणाधिकारी 2016 मध्ये सेवानिवृत्त झाले आणि काही काळातच त्यांचे निधन झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हयात नसलेल्यांच्या नावावर स्वाक्षऱ्या करून 100 पेक्षा जास्त शिक्षक भरतीचे आदेश बनावट पद्धतीने काढण्यात आले.
मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
नियुक्त्या 2016 ते 2024 कालावधीत दाखवण्यात आल्या आणि त्या बॅकडेट मध्ये दर्शवून सरकारची फसवणूक करण्यात आली. बनावट शाळा आयडी आणि बनावट दस्तऐवजांच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या प्रत्येक भरतीसाठी तब्बल 20 ते 35 लाख रुपये लाच दिल्याची माहितीही पुढे आली आहे. अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रात एक प्रकारची खाजगी दलाली निर्माण झाली आहे. पैशांच्या जोरावर नोकऱ्या वाटल्या गेल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या घोटाळ्याची गंभीर दखल घेत प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
फडणवीसांच्या हस्तक्षेपानंतर आता या 580 बोगस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी चौकशीची चक्रे वेगाने फिरवली असून, बोगस शिक्षकांच्या बँक खात्यांमधून वेतनाची माहिती गोळा केली जात आहे. हा फसवणुकीचा प्रकार केवळ नागपूरापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर आघात करणारा आहे. शिक्षकांच्या नावावर असा गोरखधंदा चालत असेल, तर खऱ्या गुणवत्तेच्या उमेदवारांचे काय? या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात पारदर्शकतेचा अभाव अधोरेखित झाला आहे.
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाने फुललं एकल शाळांचं ज्ञानवृक्ष
बनावट शिक्षक, मृत अधिकाऱ्यांची फसवणूक, लाखोंची लाचखोरी, या सर्व प्रकारांमुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. राज्य शासनाकडून आता कठोर पावले उचलली जात असली तरी, या प्रकरणाचा पारदर्शक तपास होऊन दोषींवर कडक कारवाई होणे हे अत्यावश्यक आहे. अन्यथा, शिक्षण व्यवस्था पुन्हा विश्वासार्ह होण्यासाठी फार मोठा काळ लागेल.