
नागपूर शहरातील दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडून होते. स्मार्ट सिटीमधील या गंभीर स्थितीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना फटकारले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शहरात सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी तब्बल 3600 सीसीटीव्ही लावण्यात आले होते. मात्र यात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी तब्बल 2000 कॅमेरे बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एल अँड टी कंपनीवर चांगलाच राग व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही ते नादुरुस्त का आहेत? असा थेट सवाल करत त्यांनी पंधरा दिवसांत हे सर्व कॅमेरे दुरुस्त करून शासनाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर मंत्री बावनकुळे यांनी तातडीची बैठक घेत या प्रकरणाचा सखोल आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागपूर पोलिस आयुक्तांना या कॅमेऱ्यांचे कामकाज योग्य प्रकारे होत असल्याचे त्वरित पडताळणी करण्याचे आदेश दिले. याच बैठकीत कॅमेऱ्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपयांचा एल अँड टी कंपनीवर नाराजीचा सूर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

सावध व्हा..!!! भंडारा Zilla Parishad मध्ये दगा झाल्यास अडीच वर्षांची ढय्या
कंपनीची हलगर्जी
मंत्री बावनकुळे यांनी ही कंपनी नागपूरकरांच्या विश्वासास पात्र ठरत नसल्याचा आरोप केला. सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे असलेले हे कॅमेरे बंद कसे राहू शकतात? असा सवाल उपस्थित करत त्यांनी एल अँड टीच्या कामगिरीवर ताशेरे ओढले. एल अँड टी कंपनीने दिलेली माहिती धक्कादायक आहे. 1100 कॅमेरे विविध कारणांनी बंद असल्याचे सांगण्यात आले असले तरी उर्वरित 900 कॅमेऱ्यांच्या नादुरुस्त स्थितीबद्दल कोणताही ठोस अहवाल कंपनीने दिलेला नाही. हा हलगर्जीपणाचा प्रकार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
फडणवीस पालकमंत्री असताना याकडे लक्ष का दिले गेले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरक्षा व्यवस्थेची आश्वासने केवळ गाजर दाखवणे होते का, असा आरोप होतोय. एल अँड टीला आदेश देत प्रशासनावर नियंत्रण दाखवले जात असले तरी निवडणुका जवळ आल्या की यंत्रणा जागृत होते, अन्यथा जनता उपेक्षित राहते, हे पुन्हा सिद्ध होत आहे. सरकारी निधीचा वापर कसा होत आहे, याबाबत सखोल चौकशीची मागणीही जोर धरत आहे.