
14 मे रोजी अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून विराजमान झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच विदर्भातूनच आणखी एका थोर व्यक्तिमत्वाने सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे.
14 मे 2025 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायपीठाच्या सर्वोच्च आसनावर महाराष्ट्राच्या अमरावतीचे सुपुत्र भूषण रामकृष्ण गवई विराजमान झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांनी भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. हा क्षण केवळ गवई कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण अमरावती, महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाने मस्तक उंचावणारा ठरला. एक सामान्य मराठी कुटुंबात जन्म घेऊन, अढळ निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यपरायणतेच्या जोरावर भूषण गवई यांनी न्यायव्यवस्थेत स्वतःचा ठसा उमटवला आहे. गवई यांच्या शपथविधीच्या केवळ दोन आठवड्यांतच विदर्भासाठी आणखी एक गौरवाचा क्षण आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांच्या नावासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजरिया आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांचीही नावं शिफारसीत आहेत. हे सारे घडत असताना, विदर्भाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की न्यायव्यवस्थेतील कर्तृत्व, प्रज्ञा आणि निष्ठेचा गड हा या मातीतूनच उगम पावतो. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांचा जन्म भुसावळ येथे 7 एप्रिल 1965 रोजी झाला. वडील शरच्चंद्र चांदूरकर हे विदेश संचार निगम मध्ये अधिकारी होते. त्यामुळे त्यांचे बालपण पुणे आणि विविध शहरांमध्ये गेले.

Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात फुटेज वॉर; कोर्टाकडून थेट नोटीस
उंचावलेला विदर्भ
शिक्षण सेंट व्हिन्सेंट हायस्कूल आणि नेस वाडिया महाविद्यालयात झालं, तर कायद्याचं शिक्षण पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून पूर्ण केलं. मुंबईत ज्येष्ठ वकील बी. एन. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 21 जुलै 1988 पासून वकिलीला सुरुवात केली. 1992 मध्ये ते नागपुरात स्थायिक झाले आणि विविध प्रकारचे खटले हाताळत त्यांनी आपल्या ज्ञान, तंत्र आणि संयमाने न्यायालयीन विश्वात विशेष स्थान मिळवलं. संवैधानिक, दिवाणी, फौजदारी, प्रशासकीय बाबींमध्ये त्यांनी आपलं नैपुण्य दाखवलं आहे. या आधीही विदर्भातून अनेक नामवंत न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहेत.
न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला, जनार्दन मुधोळकर, ए. पी. सेन, विकास सिरपूरकर, शरद बोबडे आणि भूषण गवई यांचे नाव देशील त्यात समावेश आहे. यातील हिदायतुल्ला, बोबडे आणि आता गवई या तिघांनी सरन्यायाधीश पद भूषवले आहे. विदर्भाची ही न्याययात्रा म्हणजे निष्ठेचा, ज्ञानाचा आणि सेवाभावाचा झंझावात आहे. गवई आणि चांदूरकर यांच्या रूपाने विदर्भाच्या मातीने सर्वोच्च न्यायालयात दोन न्यायमूर्ती दिले आहेत, तेव्हा हा भाग देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे. मराठी मातीतील मूल्यं प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभाव या दोघा न्यायमूर्तींच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलं आहे की सर्वोच्च पद मिळवण्यासाठी बड्या घराण्याची गरज नाही, तर नितीमूल्यांची गरज असते.