महाराष्ट्र

Suresh Bhoyar : मतदानात सर्वाधिक सहभाग बोगस मतदारांचा

Nagpur : कामठी मतदारसंघात निवडणुकीपूर्वी मतदार यादीत जादूई वाढ

Author

संपूर्ण राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीवरील राहुल गांधींच्या आरोपांची चर्चा सुरू असतानाच, नागपूरच्या कामठी विधानसभा मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. सर्वच पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली असतानाच 2024 विधानसभा निवडणुकीतील अनियमिततांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांवर निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपकडून खोटेपणाचा ठपका ठेवण्यात आला. मात्र, नागपूरच्या कामठी विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आकडेवारीसहित धक्कादायक माहिती सादर करून या वादाला आणखी पेटवले आहे.

भोयर यांनी नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितले की, राहुल गांधींनी मांडलेले सर्व आरोप वस्तुनिष्ठ आहेत. त्यांनी पुढे सांगितले की कामठी विधानसभेत अवघ्या सहा महिन्यांत मतदारांची संख्या 35 हजारांनी वाढली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी (2024) कामठीत 4 लाख 66 हजार 231 मतदार होते. परंतु अवघ्या सहा महिन्यांत, विधानसभा निवडणुकीच्या वेळी, ही संख्या थेट 5 लाख 1 हजार 770 इतकी झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर किंवा नवीन घरे बांधली गेली असती, तर गावकऱ्यांना तरी याची जाणीव झाली असती, असे भोयर यांनी नमूद केले. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, 29 ऑक्टोबर 2024 रोजी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीनुसार कामठीतील मतदारांची संख्या 4 लाख 88 हजार होती.

Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं मूक गूढ

आधार कार्डवर नोंदणी

अवघ्या 15 दिवसांत 30 ऑक्टोबर ते मतदानाच्या तीन दिवस आधीपर्यंत, ऑनलाईन प्रक्रियेतून तब्बल 12 हजार नवीन मतदार नोंदवण्यात आले. भोयर यांनी प्रश्न उपस्थित केला की, 15 दिवसांत एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नोंदणी कशी झाली आणि कोणत्या आधारावर झाली? माहितीच्या अधिकारातून यासंदर्भात विचारणा केल्यानंतर देखील, निवडणूक आयोगाकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. भोयर यांच्या म्हणण्यानुसार, या नव्या मतदारांच्या नोंदणीत आधार कार्डाव्यतिरिक्त कोणतेही इतर ओळखपत्र मागितले गेले नाही. त्यामुळे अनेक बोगस नोंदणी झाल्याचा संशय आहे.

कामठी विधानसभा मतदारसंघात 35 हजार नव्या मतदारांमध्ये अनेक जण मध्यप्रदेश व इतर राज्यांतील असल्याचे दिसत आहे. यापैकी अनेक व्यक्तींना स्थानिक गावकरी ओळखत नाहीत. एवढेच नव्हे तर, गावात नसलेल्या मतदारांकडून सर्वाधिक मतदान झाल्याचे निरीक्षण असल्याचा गंभीर आरोपही सुरेश भोयर यांनी केला. या सर्व प्रकारामुळे निवडणूक आयोगावर खोटी माहिती माध्यमांसमोर सादर करण्याचा आरोप भोयर यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या नव्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आगामी स्थानिक निवडणुकींवर या वादाचा काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Mohan Bhagwat : जातीभेद विसरून एक समरस राष्ट्र बांधण्याची गरज

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!