
नागपूर जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एक राजकीय चमत्कार घडला. जिथे कट्टर शत्रू समजले जाणारे भाजप आणि काँग्रेस यांनी हात मिळवणी करत राष्ट्रवादी काँग्रेसला मैदानात धूळ चारली.
नागपूर जिल्ह्यात सध्या एका अनोख्या राजकीय मैत्रीची जोरदार चर्चा आहे. पारंपरिक कट्टर विरोधक असलेल्या भाजप आणि काँग्रेसने नागपूर येथे मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत हातमिळवणी करत, एकत्रित विजय मिळवला आहे. या अनपेक्षित युतीमुळे सत्ताकारणात वादळ उठले असून, राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजपचे माजी आमदार टेकचंद सावरकर आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी ‘मतभेद नाही, मतांची बेध’ करत आपल्या-आपल्या गटांचा एकत्रित पॅनेल उभा केला.
पॅनेलने 13 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळवत मौदा खरेदी विक्री संघावर झेंडा फडकवला आहे. या युतीमुळे सगळ्यात जास्त धक्का बसला तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा सूपडा साफ झाला. यानंतर संतप्त झालेल्या गुजर यांनी थेट अजित पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला, भाजप आणि काँग्रेसने भ्रष्ट युती करत आम्हाला पाठीमागून वार केला. राजकारणात विरोधकांनी युती करणं नवीन नाही, पण सावरकर आणि केदार यांचं पूर्वीचं राजकीय वैर लक्षात घेता, ही युती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.

सत्तेचे नवे समीकरण
लोकसभेत काँग्रेसने भाजपचा पराभव केला, तर विधानसभेत भाजपने केदार गटाला जमिनीवर आणलं होतं. आज हेच दोन गट एकत्र आलेत. या युतीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घणाघाती टीका करत भाजप आणि काँग्रेसला एकाच तराजूत तोललं आहे. त्यांनी म्हटलं, ही काही पहिली युती नाही, तर ही पारंपरिक मनुवादी युती आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधत विचारलं की, जानवधारी राहुल गांधींचे हरिजन भक्त काँग्रेसला यावर प्रश्न विचारणार का?
प्रकाश आंबेडकरांच्या नागनाथ-सापनाथ या उपमेमुळे हा विषय आणखी गाजू लागला आहे. मौदा खरेदी विक्री संघाची ही निवडणूक स्थानिक पातळीवर असली, तरी त्याचे राजकीय पडसाद आता थेट मुंबईपर्यंत उमटू लागले आहेत. भाजप आणि काँग्रेसची युती ही फक्त मौद्यात मर्यादित राहते की भविष्यात आणखी निवडणुकीमध्ये असे प्रयोग पाहायला मिळणार? हे पाहणं रंजक ठरेल. या घटनेमुळे महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलणार की फक्त स्थानिक फायद्यासाठी झालेला करार होता, यावर आता पुढील काही दिवसांतच प्रकाश पडेल. पण सध्या तरी मित्र की साजिश? या प्रश्नाने राजकारण तापलेलं आहे.