
अनोळखी शहर, अनोळखी भाषा. एक बंगाली मुलगा नागपूर मेट्रो स्थानकावर एकटाच हरवलेला. पण मेट्रोच्या सहृदय कर्मचाऱ्यांनी माणुसकीचा हात देत त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा दिलं आशेचं हसू.
जीवनात काही क्षण असे असतात, जे केवळ नियोजन नव्हे तर माणुसकीचा खरा अर्थ शिकवून जातात. नागपूर मेट्रोच्या एका छोट्याशा कोपऱ्यात, एक 14 वर्षांचा बंगाली भाषिक मुलगा वाट चुकलेला, घाबरलेला आणि अनोळखी शहरात पूर्णपणे एकटा अचानक सापडला. परंतु, या मुलाच्या चेहऱ्यावरील चिंता आणि भीती मेट्रोच्या सजग व सहृदय कर्मचाऱ्यांनी क्षणात ओळखली. घडली एक अशी हृदयस्पर्शी घटना, जी आपल्याला मानवतेच्या मोलाची आठवण करून देते.
‘बिनोद’ (नाव बदललेले) नावाचा हा अल्पवयीन मुलगा पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील महिपालपूर येथून निघून कशातरी नागपूर शहरात येऊन पोहोचला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट होते. त्याच्या डोळ्यांमध्ये घराच्या आठवणींनी भरलेली एक निरागसता होती. तो ‘दोसर वैश्य चौक’ मेट्रो स्थानकाच्या तिकीट खिडकीवर उभा होता. कुणाशी बोलायला असमर्थ, कारण त्याला फक्त बंगाली भाषा येत होती.

भीती निवळली
हिंदी किंवा मराठी भाषेचा गंध नसल्यामुळे बिनोदच्या मदतीसाठी कुणी समोर येत नव्हते. पण, हे दृश्य पाहून स्टेशन कंट्रोलर शुभम बडोले यांनी पुढाकार घेतला. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीने बंगाली भाषिक सफाई कर्मचारी आशा सोनकुसरे यांना बोलावलं. त्यांच्या संवादामुळे बिनोदच्या मनातील भीती थोडी निवळली. बिनोदने थोडक्यात सांगितले की, त्याचा कुटुंबाशी संपर्क तुटलेला आहे. तो नागपूर रेल्वे स्थानक शोधत होता. या माहितीच्या आधारे सुरक्षा निरीक्षक गणेश गारकल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. बिनोदला लगेचच नागपूर रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा बल (RPF) पोलिसांकडे सोपवण्यात आले.
त्यानंतर, एफएमएस पर्यवेक्षक श्री. प्रेमदास बोरकर यांच्या हस्ते बिनोदला चाईल्डलाईन संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आले. चाईल्डलाईननेही तात्काळ कारवाई करत बिनोदच्या पालकांशी संपर्क साधला आणि त्यांच्या हृदयात आशेचा नवा किरण उजळवला. ही घटना केवळ एक प्रशासनिक कार्यवाही नव्हती; ती होती एक हृदयस्पर्शी कहाणी — एका हरवलेल्या मुलाच्या सुरक्षिततेची, एका सजग कर्मचाऱ्याच्या सहृदयतेची आणि मेट्रो व्यवस्थापनाच्या जबाबदारीची. आजच्या धकाधकीच्या जीवनात, कुणीतरी आपले मन मोकळे करून एखाद्या अनोळखी जीवाच्या मदतीसाठी धावून येतो, तेव्हा समाजात अजूनही माणुसकी शिल्लक आहे याचा प्रत्यय येतो.
नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता आणि तत्परता समाजासमोर एक आदर्श ठेवते. त्यांच्या या कृतीमुळे बिनोद एकटाच नाही, तर त्याचे कुटुंबही नव्याने सावरले. या घटनेतून शिकण्यासारखं खूप काही आहे. एक छोटीशी मदतही एखाद्याच्या आयुष्याला दिशा देऊ शकते.