
नागपूरच्या राजनगर झोपडपट्टीतील अतिक्रमण हटवण्यासाठी मनपाने कारवाई केली. या कारवाईत 50 अनधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या.
नागपूर शहरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी गुरुवारी मनपाने पुन्हा एकदा राजनगर झोपडपट्टीवर कारवाईचा बडगा उगारला. सकाळी सहालाच अतिक्रमण विभागाचा ताफा दाखल होताच झोपड्यांचे अस्तित्वच पुसून टाकण्यात आले. तब्बल 50 झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात आले. मागील आठवड्यात अर्धवट राहिलेल्या कारवाईला गुरुवारी पूर्णत्व देण्यात आले.
झोपडपट्टीवरच्या कारवाईदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महाविद्यालयाच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशेने केलेल्या अतिक्रमणावर मनपाने जोरदार हातोडा मारत संपूर्ण परिसर रिकामा केला. नागरिकांनी पूर्वसूचना मिळाल्यानंतर स्वतःहून सामान बाहेर काढल्याने मोठ्या अनुशासनात ही कारवाई पार पडली.

Chandrashekhar Bawankule : नागपुरातील वीज कामगारांना मिळणार घरे
सुरक्षिततेसाठी पाऊल
राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे शैक्षणिक व आपत्कालीन व्यवस्थापनावर धोका निर्माण झाला होता. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही अतिक्रमण थांबत नव्हते. त्यामुळे 16 एप्रिल रोजी सुरू झालेल्या मोहिमेला गुरुवारी निर्णायक वळण देण्यात आले.
महाविद्यालयाच्या दक्षिण बाजूस असलेले मुख्य प्रवेशद्वार, पूर्वेकडील संरचना आणि पश्चिमेची सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली. ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर आधारित आहे. मनपा प्रवर्तन विभागाचे सहाय्यक आयुक्त हरीश राऊत, अधीक्षक संजय कांबळे व कनिष्ठ अभियंता भास्कर माळवे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली.
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखावा
पोलिसांचा सज्ज बंदोबस्त
प्रवर्तन विभागाच्या कारवाईस महिलांनी ठाम विरोध दर्शवला. मात्र जेसीबी व पोकलेनच्या सहाय्याने झोपड्यांचे अतिक्रमण हटवण्यात आले. काही ठिकाणी जोरदार आक्रोशही झाला.परंतु पोलिसांनी स्थिती नियंत्रणात ठेवली. मनपा प्रशासनाने नागरिकांच्या भावना जपत शांततापूर्वक कारवाई केली.
राजनगरबरोबरच गड्डीगोदाम चौकातील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारातील 3 ते 4 अनधिकृत शेड्सवरही जेसीबी चालवण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत महाल ते इतवारी या मुख्य मार्गावरील फुटपाथ व रस्त्यालगत लावलेले अनधिकृत ठेले, हातगाड्या, दुकाने हटवण्यात आली. या कारवाईत सुमारे एक ट्रक इतके साहित्य जप्त करण्यात आले.
मनपा प्रशासनाने अशा अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भविष्यात कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. नागपूर शहरात शासकीय जागांवर अतिक्रमण करून निर्माण होणाऱ्या अडचणींना आळा बसावा यासाठी मनपा पुन्हा सज्ज झाल्याचे या कारवाईतून दिसून आले.