
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारी जोरात सुरू असताना, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका केली आहे.
राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अखेर 2025 मध्ये होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला चार महिन्यांत निवडणूक घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची धडपड सुरू झाली आहे. राजकारणात पुन्हा एकदा गती निर्माण झाली असून सर्वच पक्षांनी आपली रणनिती आखायला सुरुवात केली आहे. यंदाची निवडणूक दोन टप्प्यांत पार पडणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष वेधलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी पैशाच्या बळावर सत्ता मिळवण्याचा सपाटा लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार म्हणाले, भाजपाने सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता मिळवण्याचं गणित अचूक साधलं आहे. त्यांच्या मते, नागपूर महापालिकेत एकापेक्षा एक गंभीर समस्या आहेत. अपूर्ण विकास प्रकल्प, नागरी सुविधांची दुरवस्था, आणि मनपातील कथित घोटाळे.

Devendra Fadnavis : गडचिरोलीपासून कोकणापर्यंत भविष्याची शिल्परेषा
आघाडीचा अंदाज
सर्व गोष्टींवर पडदा टाकत भाजपा फक्त सत्ता मिळवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. भाजपाचं लक्ष नागरी विकासापेक्षा सत्तेच्या खुर्चीकडे अधिक आहे, असा टोला लगावत वडेट्टीवार म्हणाले, केंद्रीय मंत्री नागपूरचे असूनही शहरात कामांचं काय झालं? मुख्यमंत्री देखील आपल्या तयारीत मग्न आहेत, मात्र शहराचं चित्र अजूनही धूसर आहे. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची काय भूमिका असेल यावर विचारण्यात आले असता, वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. आमच्या बांधिलकीनुसार, प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी करावी की नाही, हे आम्हीच ठरवतो.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी झाला होता, त्यामुळे ते आघाडीत आहेत, हेही त्यांनी सांगितले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या संदर्भात विचारले असता, वडेट्टीवार म्हणाले, पवार साहेब काय निर्णय घेतील, हे तेच सांगू शकतात. पण आम्हाला वाटतं की, त्यांचा भाजपाशी जाण्याचा फारसा संभव नाही. काँग्रेसने हेही स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींबाबत अंतिम निर्णय हा स्थानिक कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल. जर आघाडी झाली, तर आम्ही एकत्र लढू, आणि नाही झाली, तर काँग्रेस स्वतंत्रपणे रिंगणात उतरेल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
राजकीय रंगत वाढ
वडेट्टीवार यांनी ठामपणे सांगितलं की, भाजप ज्या प्रकारे आघाडीच्या नावाखाली जनतेला गोंधळात टाकते, त्यामागे अनेक गुपितं आहेत. पण आम्ही हे सर्व समोर आणणार आहोत. नागपूरच्या जनतेला सच्चा पर्याय देणं हेच आमचं ध्येय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा राजकीय रंगत वाढवली आहे. सत्ताधारी भाजपाची योजना काय असेल, काँग्रेसचा पुढचा डाव कसा असेल आणि आघाडी होईल की नाही, यावर येत्या काही दिवसांत अधिक स्पष्टता येणार आहे. पण एक मात्र नक्की सत्तेची लढाई आता खऱ्या अर्थाने रंगतदार होणार आहे.