
नागपूरची नागनदी ही सध्या साफसफाईच्या अभावामुळे मोठ्या संकटात सापडली आहे. पावसाळा उंबरठ्यावर असतांना नागरिकांना पुराचा धोका जाणवत आहे.
नागपूर शहराच्या हृदयातून वाहणारी नागनदी ही फक्त एक नदी नाही, तर नागपूरच्या ओळखीचाच एक गाभा आहे. ती केवळ निसर्गसंपत्ती नसून, या शहराच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मात्र, दुर्दैवाची गोष्ट अशी की, हीच नदी आता नागपूरकरांसाठी संकट बनून उभी राहिली आहे. दरवर्षीसारखे यंदाही शहर प्रशासनाने नागनदीच्या स्वच्छतेच्या घोषणा मोठ्या थाटात केल्या, पोस्टर्स लावले, फोटोसेशन्स झाले, परंतु प्रत्यक्षात नदीचा काठ अजूनही गाळात बुडलाच आहे. शहरातील नागरिक आजही हलक्याशा पावसातही घरात पाणी शिरल्याचा अनुभव घेत आहेत. तर मुसळधार पावसात काय होईल, याची कल्पनाच भीतीदायक आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (22 जून रोजी) नागनदी प्रदूषण प्रतिबंध प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रविण दटके आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नागनदीच्या तातडीच्या सफाईवर भर दिला आणि शहरातील एसटीपी (सीवेज ट्रीटमेंट प्लांट) प्रकल्पांची गती वाढवण्याचे निर्देश दिले आहे. विशेषतः वीएनआयटी आणि पंजाबराव कृषि विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्रकल्पांना वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

Devendra Fadnavis : उपराजधानीत ‘स्वप्न निकेतन’ने दिला नवजीवनाचा आधार
प्रशासनाला जागं करा
सोबतच शहरातील जलवाहिनी आणि सीसीटीव्ही प्रकल्पांवर देखील लक्ष देण्याचा इशारा गडकरी यांनी दिला.यापूर्वी अनेक नेत्यांनी, आमदारांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. मनपा दरवर्षी फोटोंसाठी नाले सफाई करते, पण नागनदीत गाळ तसाच आहे. हा केवळ औपचारिकतेसाठीचा खेळ आहे. अश्या अनेक तक्रारी याबाबत आल्या आहेत. नागपूरकरांचे जीवन पाण्यात घालवण्याचे पाप मनपाच्या दुर्लक्षामुळे घडतेय. नागनदी म्हणजे नागपूरच्या श्वासाची रेषा आहे, तिच्या स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांनी विश्वास ठेवून निवडून दिले, पण आज त्यांनाच पाण्यात उभं राहावं लागतं, ही बाब लज्जास्पद आहे, असा टोला अनेकांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याच मुद्द्यावर भाष्य करत, नागनदीची स्वच्छता संपूर्णपणे आणि तात्काळ करण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी त्यांनी प्रशासनाला झोपेतून जागं होण्याचा इशारा दिला. पावसाळा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. जर योग्य ती कार्यवाही झाली नाही, तर यंदाही शहराला जलभराव आणि सार्वजनिक आरोग्याच्या संकटाला सामोरे जावे लागेल. नागनदीचे पुनरुज्जीवन केवळ सरकारच्या कागदावरील योजनांनी नाही, तर खऱ्या कामगिरीने शक्य आहे.नागनदीचा श्वास थांबला आहे. तिचा जीव गुदमरतो आहे. नागपूर शहराला दरवर्षी पाण्यात बुडवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे.
नागनदी पुन्हा प्रवाही होणार की नागपूर पुन्हा एकदा पाण्याच्या फटक्याने जागं होणार? हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आता तरी शहर प्रशासनाला जागं व्हावंच लागेल.