
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या संत्रा उद्योगाला मोठी चालना देण्याचा संकल्प व्यक्त करत, पतंजलीच्या मेगा फूड पार्कमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याचा विश्वास व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शैली म्हणजे थेट, दिलखुलास आणि प्रसंगी मिश्किल. नागपुरातील वनामती येथे संत्रा उत्पादकांच्या कार्यशाळेत त्यांनी अशीच एक मिश्किल टिप्पणी करत योग गुरु रामदेवबाबांवर सूचक विधान केले. संत्रा प्रक्रिया उद्योगावर बोलताना त्यांनी म्हटले की, रामदेवबाबांनी आमच्या सांगण्यावरून नागपुरात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पासाठी दररोज 800 टन संत्र्याची गरज आहे. जर एवढे संत्रे मिळाले नाहीत, तर रामदेवबाबांना इथेच योगासन करावे लागेल.
गडकरी पुढे म्हणाले, सध्या नागपूर आणि विदर्भातील शेतकरी एकरी चार ते सहा टन संत्र्याचे उत्पादन घेत आहेत. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे उत्पादन 20 ते 25 टनांपर्यंत वाढवता येईल. यासाठी जमिनीची योग्य तपासणी करून सुधारित संत्र्याची लागवड करणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आणि रोगरहित रोपे वापरणे गरजेचे आहे. नुकतेच पतंजली उद्योग समूहाने नागपुरात आशियातील सर्वात मोठा फूड आणि हर्बल पार्क उभारला आहे.

गडकरींचा विश्वास
संत्र्याच्या प्रचार-प्रसारासाठी नागपूर विमानतळावर बाराही महिने उपलब्ध असणारा खास ब्रँडेड संत्रा विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. मदर डेअरीकडूनही एक हजार टन संत्र्याची ऑर्डर मिळवून देण्यात आली आहे. ही संत्री देशभरातील इतर बाजारपेठांमध्ये पाठवली जाणार आहेत. यामुळे नागपूरसह विदर्भातील संत्र्यांचे ब्रँडिंग होऊन त्याला देशभरात मोठी मागणी निर्माण होईल.
नऊ मार्च रोजी मिहान सेझ येथे या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. या प्रकल्पामुळे दहा हजार नव्या रोजगार संधी निर्माण होतील, तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल, असे गडकरी यांनी सांगितले होते. सप्टेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. आतापर्यंत यामध्ये एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गडकरींनी मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या अनुभवाचे उदाहरण दिला. तेथील लहान संत्र्याला केवळ दोन रुपये प्रतिकिलो दर मिळतो.
Harshwardhan Sapkal : पैशाअभावी गेले प्राण, रुग्णालयासह सरकारवर आरोपांचे बाण
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
नागपुरातील मात्र पतंजलीच्या प्रकल्पामुळे त्याला 20 ते 22 रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपले संत्रे नागपुरात पाठवावेत, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हे सुवर्णसंधीचे क्षण आहेत. स्थानिक संत्र्यांना आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची मोठी संधी असून, पुढील काळात विदर्भातील संत्रा ‘ग्लोबल ब्रँड’ होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.