
एकीकडे संपूर्ण नागपूर उन्हाने त्रासलेले असतांना दुसरीकडे नागपूरच्या पार्वतीनगरमध्ये पाइपलाइनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून लिकेजची समस्या होत आहे.
गेल्या दोन दिवसांत पडलेला क्षणिक अवकाळी पाऊस वगळता संपूर्ण नागपूर शहर तापतेय. उन्हाच्या झळांनी जनजीवन होरपळले असतानाच दुसऱ्या टोकाला पाण्याच्या टंचाईची झळ देखील वाढत चालली आहे. मात्र, कळमणा येथील पार्वती नगरमध्ये चित्र काहीसं वेगळं आहे. इथे लोक प्यायला पाणी मागतात आणि दररोज हजारो लिटर पाणी गळतीमधून वाया जातंय. सहा महिन्यांपूर्वी अमृत दोन प्रकल्पाअंतर्गत नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाइनमधून मागील दहा दिवसांपासून तब्बल चार ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत आहे.
गळती इतकी तीव्र आहे की काही घरांमध्ये पाणी शिरून मालमत्तेचे नुकसान होत आहे. काही घरांचे तळमजले चिखलात न्हाल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा उपद्रवही वाढला आहे. स्थानिक रहिवासी आणि युवासेना नागपूर जिल्हाध्यक्ष निलेश टिघारे यांनी सांगितले की, ही पाईपलाइन वापरात आणताच गळती सुरू झाली. चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहते आहे. मोठुरा लेआउटजवळ, पार्वती नगरच्या अंतर्भागात, एका वळणाजवळ आणि इरा स्कूलसमोर. दर दोन तासांच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी सतत पाणी वाहते.

घरं झाली जलकुंडं
एकूण अपव्यय किती मोठा आहे, याची कल्पना तुम्ही करू शकता, असं त्यांनी स्पष्ट केलं. हे दृश्य पाहून रहिवासी हताश झाले आहेत. एकीकडे लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, टँकरसाठी वाट पाहावी लागते आणि दुसरीकडे इतकं अमूल्य पाणी गळतीतून वाहून जातंय, केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे. टिघारे यांनी सांगितले की, या समस्येविषयी महानगरपालिकेला वारंवार माहिती देण्यात आली होती. मी स्वतः सुपरवायझर व अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यांनी समस्या मान्य केली, पण प्रत्यक्षात काहीच कारवाई झाली नाही, असं त्यांनी सांगितलं.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची उदासीनता यावरून स्पष्ट होते. या गंभीर स्थितीनंतर टिघारे यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी केली आणि नंतर झोनल कार्यालयात धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्याने अखेर संपूर्ण पाइपलाइनचा पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले, ही गोष्ट खरोखरच उशिरा का होईना, पण काही हालचाल झाली हे दर्शवते. या सगळ्या गोंधळात पार्वती नगरचे रहिवासी रोज नवा त्रास भोगत आहेत. त्यांच्या घरांत चिखलाच चिखल झालाय, काही घरांमध्ये ओल्या भिंती व गिळलेली फर्निचर अशी अवस्था आहे. सरकार म्हणतं पाणी वाचवा, पण इथे आम्हालाच वाचवा म्हणायची वेळ आली आहे, असं एका स्थानिकाने संतापून सांगितलं.