
नागपूर पोलिस परिमंडळ 4 ने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये तब्बल 173 प्रकरणांची घट घडवून आणत पोलिसांनी शहरवासीयांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ केला आहे.
शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या नागपूर पोलिसांनी आणखी एक मोलाचा टप्पा गाठला आहे. परिमंडळ 4 अंतर्गत एप्रिल 2024 आणि एप्रिल 2025 या कालावधीत गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. एकूण 946 गुन्ह्यांच्या तुलनेत फक्त 773 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच 173 गुन्ह्यांची घसरण पोलिसांच्या यशस्वी उपाययोजनांचे स्पष्ट द्योतक ठरते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत खूनाचे प्रकार एका घटनेने कमी झाले आहे. 2024 मध्ये 12 खून नोंदले गेले होते तर 2025 मध्ये हे प्रमाण 11 वर आले. घरफोडीचे प्रकार 121 वरून 104 वर आले, म्हणजेच 17 प्रकरणांची घट झाली आहे. जबरी चोरीच्या घटनांमध्ये 26 वरून 16 इतकी 10 घट झाली. सोनसाखळीची जबरी चोरी 9 वरून 5 वर आली असून 4 प्रकरणांनी घट झाली आहे. दरवाजा चोरीचे 2 प्रकरणे पूर्णतः थांबवण्यात पोलिसांना यश आले. वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये मोठी घट म्हणजेच 181 वरून 153 वर आल्यामुळे 28 प्रकरणांची घट झाली आहे.

प्रभावी उपाय
प्राणांतिक हल्ले हे सर्वाधिक चिंतेचे होते, परंतु या गंभीर गुन्ह्यांमध्ये 287 वरून 226 वर येत 61 प्रकरणांची लक्षणीय घट झाली आहे. बलात्काराच्या घटना 40 वरून 19 वर आल्या आहेत, म्हणजेच 21 घट झाली आहे. मात्र, फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये काहीशी वाढ झाली असून 25 वरून 45 वर गेले आहेत. इतर विविध गुन्हे 169 वरून फक्त 79 वर आले आहेत. 90 घट झालेल्या या गुन्ह्यांवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आळा घातला आहे.
Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा कर्जमाफीची ट्रेन डीसीएम ते सीएम निवासापर्यंत
नागपूर पोलिसांची ही यशस्वी कामगिरी घडवून आणण्यात पोलिस उपायुक्त प्रशांत साळवे यांच्या नेतृत्वाखालील परिमंडळ 4 मधील योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. गुन्हेगारीच्या हॉटस्पॉट परिसरांचे बारकाईने निरीक्षण, स्थानिक गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांचे प्रतिबंधात्मक पद्धतीने नियमन. बीट मार्फत गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण अशा विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. याशिवाय, पोलिसांनी नागरिकांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यावर भर दिला. जनजागृती अभियानांमधून नागरिकांना जागरूक करणे. स्थानिक पातळीवर सूचना प्रणाली सक्षम करणे, आणि पोलिसांना माहिती मिळवण्यासाठी अधिक विश्वासार्ह बनवणे यामुळे गुन्हेगारांना आळा बसला.
प्राप्त झालेले हे यश केवळ पोलिसांचे नाही तर नागरिकांचाही त्यात मोठा सहभाग आहे. पोलिस प्रशासनाने सांगितले आहे की, येत्या काळात देखील या धोरणांचा विस्तार करून गुन्हेगारी पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, तपास प्रक्रियेत पारदर्शकता, आणि ठोस कार्यवाही हे यापुढील काळात प्राथमिकता असतील. पोलिस आयुक्त मा. रजनीश सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 4 मधील अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक, कर्मचारी, तपास पथके यांनी संयुक्तपणे ही कामगिरी साध्य केली आहे. नागपूर परिमंडळ 4 मधील हे यश संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद आहे. सुरक्षित नागपूर घडवण्यासाठी पोलिस आणि जनतेच्या एकत्रित प्रयत्नांची ही जिवंत उदाहरण ठरली आहे.