
नागपूर शहरात वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘मिशन जीवन रक्षा’ अभियान सुरू केले आहे. या मोहिमेंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.
नागपूर शहरातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक, नागपूर शहर यांनी ‘मिशन जीवन रक्षा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. हे अभियान वाहतूक नियमांचे पालन वाढवून, नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या अभियानाअंतर्गत 13 व 14 मार्च रोजी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी आणि डि.डी. पथकांच्या माध्यमातून कठोर तपासणी करण्यात आली.
मोहिमेअंतर्गत नागपूर वाहतूक पोलिसांनी शहरातील एकूण चाळीस ठिकाणी नाकाबंदी केली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात कठोर कारवाई केली. दोन दिवसांच्या या तपासणी दरम्यान, 310 मद्यप्राशन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 5 हजार 20 वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कठोर कारवाई
‘मिशन जीवन रक्षा’ अंतर्गत वाहतूक पोलिसांनी नशेच्या अवस्थेत वाहन चालविणाऱ्या चालकांवर कडक पावले उचलली आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास संबंधित चालकास 10 हजार दंड आकारण्यात येणार आहे. हा उपक्रम अपघात रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. भविष्यात देखील अशा कठोर कारवाया सातत्याने सुरू राहणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कठोर पावले उचलली जात आहे. शहरातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे. ट्रॅफिक सिग्नल पाळणे, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करणे, योग्य वेळी वाहनाची देखभाल करणे यांसारख्या गोष्टींचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.
Congress : राणेंच्या सिंधुदुर्गातील गडाला सपकाळांकडून सुरुंगाचे प्रयत्न
वाहतूक समस्या नोंदवा
वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी, यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक मित्र व्हॉट्सॲप क्रमांक 8976897698 सुरू केला आहे. शहरातील नागरिकांनी जर कोणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असेल, वाहतुकीस अडथळा निर्माण करत असेल किंवा मद्यप्राशन करून वाहन चालवत असेल, तर त्यांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, वेळ व स्थानासह तक्रार या क्रमांकावर पाठवावी. प्राप्त झालेल्या तक्रारीवर वाहतूक पोलिसांकडून तात्काळ कारवाई केली जाईल.
शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेस प्राधान्य द्या. नागपूर शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे अभियान एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करा आणि शहराच्या प्रगतीस हातभार लावावा, असे वाहतूक पोलिस उपायुक्त अर्चित चांडक म्हणाले.