
नागपूरमध्ये सुरू असलेल्या रस्ते खोदकामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना गटाचे नेते समीर शिंदे पुढे सरसावले आहेत.
नागपूर विदर्भाची हृदयस्थानी असलेली ही उपराजधानी सध्या विकासाच्या नावाखाली खोदकामाच्या विळख्यात अडकली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपूरमध्ये रस्त्यांचे सिमेंटकरण, सिव्हर लाइन, ड्रेनेज पाइप्स आणि केबल टाकण्याचं काम जोमाने सुरू आहे. परंतु या सगळ्या कामांच्या गोंधळात नागपूरकरांना अक्षरशः रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये रस्ते खोदले गेले आहेत. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर त्यांची दुरुस्ती अद्यापही करण्यात आलेली नाही. पावसाळ्याच्या तोंडावर ही खोदाई नागपूरकरांसाठी जीवघेणी ठरत आहे.
सायंकाळी अंधार पडल्यानंतर हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विकासकामे आवश्यकच आहेत, मात्र नागरिकांचा जीव धोक्यात घालून विकास करणे, ही कोणती प्रगती? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाचे दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम नागपूरचे नेते समीर शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. समीर शिंदे यांनी महापालिकेकडे याबाबत ठोस भूमिका मांडली आहे. शिंदे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांना निवेदन सादर करत रस्त्यांचे वेळेत पुनःस्थापन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

पुनर्बांधणीचे आश्वासन
शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, रस्त्यावर केबल, सिव्हर लाइन किंवा ड्रेनेजसाठी केलेली खोदाई केवळ कामापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती नागपूरकरांच्या जिवावर बेतू लागली आहे. योग्य वेळेत पुनर्बांधणी न झाल्याने रस्त्याखाली बसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे गंभीर अपघात घडू शकतात. महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार कामाच्या पूर्णतेकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. निवेदनादरम्यान समीर शिंदे, राजेश रेवतकर, राहूल पांडे, धम्मा सोनटक्के, विशाल कोरके, सुधीर कोमलकर, रूपेश ठाकरे, प्रवीण कोहाड, प्रशांत फुलझेले, राजकुमार धांडे, निरंजन नाकाडे यांसारखे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करणं सोप्पं आहे, पण नागपूरकरांची रोजची कसरत, त्यांचा जीव धोक्यात आहे यावर कोण बोलणार? महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, लवकरच रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या कामास गती देण्यात येईल. नागरिकांचा जीव धोक्यात न येऊ देता विकासकामे योग्य नियोजनाने करावीत, हीच अपेक्षा नागपूरकरांकडून व्यक्त केली जात आहे.
Nagpur : गुन्हेगारीच्या अंधारात नागपूर पोलिसांचा ‘थंडर’स्ट्रोक