
नागपूर ग्रामीण पोलिसांनी 100 दिवसीय आराखडा मोहिमेत राज्यात दुसरे स्थान मिळवले. त्यांच्या पारदर्शक आणि आधुनिक कामकाजाची राज्यभर चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन आणि प्रशासनातील कार्यक्षमतेचा प्रत्यय देत नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने राज्य सरकारच्या 100 दिवसीय कृती आराखडा मोहिमेत महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. महाराष्ट्रात पारदर्शक आणि आधुनिक पोलिसिंगच्या दिशेने मोठं पाऊल टाकले. नागपूर ग्रामीण पोलिस दलाने संपूर्ण राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आपला ठसा उमठवला आहे.
क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या केंद्रीय संस्थेने घेतलेल्या मूल्यांकनात नागपूर ग्रामीण पोलिसांनी 100 पैकी 80 गुण मिळवत एक ठळक यश प्राप्त केले. ही कामगिरी म्हणजे केवळ आकड्यांची भर नाही, तर कार्यपद्धतीतील सकारात्मक बदलांची आणि प्रशासकीय कटिबद्धतेची साक्ष आहे. विभागाचे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी या उल्लेखनीय यशासाठी संपूर्ण ग्रामीण पोलिस दलाच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली.

शासनाची विशेष मोहीम
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्नांद्वारे या मोहिमेला गती दिली. 7 जानेवारी ते 16 एप्रिल 2025 कालावधीत राबविण्यात आलेली ही विशेष मोहीम केवळ सौंदर्यपुरती नव्हती, तर ती व्यवस्थात्मक सुधारणा, पारदर्शकतेची रुजवणूक आणि जनतेशी जवळीक साधणाऱ्या यंत्रणांच्या बांधणीसाठी होती.
राज्यातील सर्व पोलिस अधीक्षक कार्यालयांची मूल्यांकन प्रक्रियेद्वारे तपासणी झाली. त्यामध्ये पालघरने प्रथम क्रमांक पटकावत नेतृत्व मिळवले. तर नागपूर ग्रामीणने स्वतःची ओळख दुसऱ्या स्थानावर निश्चित करत आपले प्रशासकीय वजन दाखवून दिले. ही क्रमवारी आकडेवारीच्या वर जाऊन यंत्रणेतील सूक्ष्मतेने केलेल्या सुधारणा आणि जबाबदारीचे दर्शन घडवते.
कार्यपद्धतीत नाविन्यपूर्ण प्रयोग
शंभर दिवसीय कृती आराखड्यात संकेतस्थळ विकास, केंद्र सरकारशी समन्वय, कार्यालयीन स्वच्छता, तक्रार निवारण प्रणाली, कार्यपद्धती सुधारणा, कर्मचारी प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला होता. नागपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रत्येक बाबतीत अचूक नियोजन आणि अंमलबजावणी करत प्रभावी कामगिरी बजावली.
विशेषतः तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये जलद प्रतिसाद प्रणाली आणि नागरिकांची थेट संवाद व्यवस्था यामुळे सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला. कार्यालयीन परिसराच्या स्वच्छतेपासून ते डेटा व्यवस्थापनातील सुधारणा या सर्व स्तरांवर झालेल्या सकारात्मक बदलांनी नागपूर ग्रामीण विभागाने स्वतःची एक प्रगत, जबाबदार आणि लोकाभिमुख पोलिस यंत्रणा म्हणून ओळख निर्माण केली.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमांनी संपूर्ण राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एक कार्यक्षमतेचा नवा मानक तयार केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील संघटित प्रयत्न, कर्मचारी प्रशिक्षणाची सातत्यपूर्ण साखळी आणि तंत्रज्ञानाचा बुद्धिमत्तेने वापर यामुळे ही कामगिरी शक्य झाली. या मोहिमेचा मूळ उद्देश प्रशासनात नागरिकाभिमुखता रुजवणे हा होता.