
उपराजधानी नागपूरमध्ये पावसाने हजेरी लावली असतानाच, 25 जून रोजी झालेल्या पहिल्या पावसात शहर जलमग्न झाले आहे.
राज्यात मॉन्सूनने हलक्याच नव्हे तर जड पावलांनी आगमनाची नांदी दिली आहे. पावसाच्या झडांमध्ये काही भाग आधीच भिजले असताना, आता उपराजधानी नागपूरच्या अंगणात पावसाचा डाव रंगू लागला आहे. 25 जून 2025 रोजी यंदाच्या पावसाळ्याचा पहिला पाऊस नागपूरवर कोसळला. मात्र मनपाच्या ‘तयारीचे’ फुगे पाहता पाहता फुसकले. गेल्या दोन वर्षांत नागपूरकरांनी महापुराचा थरार अनुभवला आहे. पुराचं रौद्ररूप, गळ्यापर्यंत पाणी आणि मदतीसाठी हात वर करून वाट पाहणारी लोकं हे चित्र नागपूरच्या आठवणीत अजूनही ताजं आहे. त्यामुळेच यंदा नागपूर महानगरपालिकेने ठामपणे सांगितलं होतं, ‘नाही हो! यंदा महापुराचा त्रास नाही’.
परंतु 25 जूनच्या पहिल्याच पावसानेच या दाव्यांचं काय झालं? असा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी मनपाचे अधिकारी तोंडात गोड गोड बोल आणि हातात कागदांवरची योजना घेऊन जनतेला आश्वासनांची फुले वाटत होते. मात्र हे आश्वासन आता फोल ठरतांना दिसत आहे. महापालिकेच्या कामांची पोलखोल पहिल्याच पावसात झाली आहे. अवघ्या दोन तास पडलेल्या पावसाने नागपूरच्या अनेक भागांना अक्षरशः जलसमाधी दिली. या जलसमाधीने रस्ते स्विमिंगपूल बनले, शहराच्या गल्ल्या नद्या झाल्या. गेल्या दोन महिन्यांपासून मनपाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक सुरू होती.

Akola : राज राजेश्वर मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्जावर श्रेयवादाची झुंज
पुरप्रतिबंधक योजना फसली
मनपाने तेव्हा मात्र ‘पावसाळ्याची तयारी पूर्ण आहे’ असे गर्जनेने सांगितले होते. पण प्रत्यक्षात चित्र काय? रस्त्यांचे उघडे गटार, खोदलेले मार्ग, अपूर्ण पूल आणि त्यात वाहतूक नियोजनाचा बोजवारा. यामुळे नागपूरच्या चौकाचौकात चक्क ट्रॅफिक जामचा पाऊस सुरू झाला. कुठे सिग्नल बंद, कुठे वाहनांची रांग, तर कुठे पाण्यात अडकलेली दुचाकी-चारचाकी. नागपूरच्या हृदयात वाहणारी नाग नदी ही केवळ नदी नाही, तर नागपूरच्या अस्तित्वाचा श्वास आहे. पण हीच नाग नदी आता नागपूरकरांच्या जीवावर उठली आहे. वर्षभर स्वच्छतेच्या नावाने लाखोंचा खर्च होतो आणि पावसात तासाभरात नदी भरभरून वाहते. हे दृश्य नागपूरकरांना नवीन नाही. पण यावेळी नागरिकांच्या रागाच्या धारेत मात्र अधिक धार आली आहे.
प्रशासन दरवर्षी नदी स्वच्छता अभियान, ड्रेनेज सुधारणा, पुरप्रतिबंधक योजना याचे ढोल वाजवत असते. पण ढोलाच्या पोकळ वाजण्यासारखी ही योजना तितकीच पोकळ ठरली आहे. थोडंही पाणी आलं की नाग नदीला उफाण येतो, पाणी किनाऱ्याबाहेर जातं आणि जवळच्या वस्त्यांमध्ये पाणी घराघरात शिरतो. रहिवाशांची व्यथा काही वेगळी नाही. हलक्याश्या सरींनीच घरात पाणी शिरलं, तर पुढे काय होईल?’ असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. नागपूरच्या महापालिकेचा महापूर टाळण्याचा फॉर्म्युला यंदाही फेल झालाय का? हा प्रश्न नागरिकांच्या मनात वीजेसारखा चमकतोय.
Vijay Wadettiwar : मनुस्मृतीच्या सावलीत संविधानाचा दिवा लावण्याचं नाटक
नागपूरकरांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर मनपाच्या ‘तयारी’चा चांगलाच समाचार घेतला आहे. पावसाने जणू नागपूर महापालिकेला आरशात पाहायला लावलं आहे. पण हा आरसा पाहून त्यांनी स्वतःला सुधारायचं की पुन्हा जुन्याच ढापात दावे करत राहायचं, हे येणारा पावसाळा ठरवेल.