
नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुख्य आरोपी फहीम खानवर कारवाईचा वेग वाढला आहे. लवकरच त्याच्या अनधिकृत घरावर बुलडोझर चालवण्याची शक्यता आहे.
नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण होते. या घटनेचा मुख्य आरोपी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता त्याच्यासाठी आणखी अडचणी वाढल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेने त्याच्या घराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे लवकरच फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.
यशोधरानगरमधील संजय बाग कॉलनीत राहणाऱ्या फहीम खानने आपल्या घराजवळ तब्बल 900 चौरस फूट जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले आहे. याच कारणाने नागपूर मनपाने त्याला नोटीस बजावली आहे. लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. फहीम खानवर धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि आता महानगरपालिका देखील त्याच्यावर कारवाईसाठी तयारी करत आहे. त्यामुळे नागपूरमध्ये या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

Nagpur : प्रेमसंबंधांच्या वादातून ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या
करडी नजर
संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारे पोस्ट आणि रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नागपूर सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर कडक नजर ठेवली आहे. कोणत्याही वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यांवर थेट कारवाई केली जात आहे.
नुकतीच नागपूर ग्रामीण पोलिसांनी दोन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पारशिवनी येथील रवींद्र सदाशिव बर्वे यांनी फेसबुकवर हिंदू धर्मग्रंथाबाबत वादग्रस्त पोस्ट टाकली होती, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काटोलमधील हर्षल गणेश ऑस्करकर यांनी औरंगजेबबाबत आक्षेपार्ह स्टोरी टाकल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
धार्मिक पोस्ट
काटोलमध्येही याआधी 23 वर्षीय दिव्यम बैसवर औरंगजेबबाबत धार्मिक भावना भडकवणारी रील पोस्ट केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत नागपूर ग्रामीण पोलिसांनी तीन वेगवेगळ्या लोकांवर गुन्हे नोंदवले आहेत. नागपूरमध्ये वाढत्या तणावामुळे प्रशासन आता अधिक सतर्क झाले आहे. जमीन आणि सोशल मीडिया दोन्ही पातळ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. मात्र, फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra : बुलढाणा जिल्ह्यातून राज्यभरात ‘जीवंत सातबारा’चा नवा अध्याय