
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या मुद्द्यावरून उसळलेल्या हिंसाचारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आता मोठ्या संघर्षात बदलला आहे. नागपूरच्या महाल परिसरात हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये सुरू झालेला वाद अचानक हिंसक झाला. जमावाने दगडफेक आणि जाळपोळ सुरू केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या तणावामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या सर्वात आता विरोधकांनी सरकारला प्रयत्न सुरु केले आहे. अनेक नेत्यांनी यावर आपली सुरुवात केली आहे.

Nagpur Riot : दंगलीनंतर सायबर सेलचे पूर्ण महाराष्ट्रावर बारीक लक्ष
गृहमंत्र्यांच्या अपयशावर सवाल
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर शहरात रात्री घडलेली दगडफेकीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत नागपूरकरांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर हे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचे शहर असूनही, येथे मोठ्या प्रमाणात दंगलीसारखी स्थिती निर्माण होणे हे गृहविभागाच्या अपयशाचे द्योतक आहे. नागपूर हे विविध धर्मीय लोकांचे शांततेने नांदणारे शहर आहे. या प्रकारामुळे शहराच्या सामाजिक सलोख्यावर गहिरे परिणाम होण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही मंत्र्यांनी सातत्याने भडकावू वक्तव्ये करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. नागपूरमध्ये त्याचा परिणाम दिसूनही आला. राज्यासमोर बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीची अपूर्ण आश्वासने यांसारखे अनेक गंभीर प्रश्न असताना, त्याकडे दुर्लक्ष करून धार्मिक मुद्द्यांवर वातावरण तापवले जात आहे. नागपूरने नेहमीच सर्वधर्मीय ऐक्याचे उदाहरण दिले आहे. रामनवमीला हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन रथ ओढतात आणि ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यात हिंदूंनी मोठ्या संख्येने दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी नागपूरला अशांत करण्याचा हा प्रयत्न ओळखून, नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन सपकाळ यांच्याकडून करण्यात आले आहे.
तातडीची बैठक
मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूरमध्ये हिंसाचार उसळला असला, तरी प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आहे.