
पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करत कडक प्रत्युत्तर दिलं. मात्र युद्धसदृश वातावरणात अचानक युद्धबंदी जाहीर झाल्याने आता सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेल्या भीषण आणि भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतप्त झाला होता. या घटनेनंतर भारतीय सैन्याने अभूतपूर्व धाडस दाखवत “ऑपरेशन सिंदूर” राबवले. अवघ्या 30 मिनिटांत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे आणि लष्करी हवाई तळ उद्ध्वस्त करत भारतीय लष्कराने शौर्याचा नवा इतिहास घडवला. मात्र या पराक्रमानंतर देशात एकच प्रश्न उपस्थित होतो की, युद्धसदृश वातावरणात अचानक युद्धबंदी कशी आणि का झाली?
युद्धबंदीच्या याच मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शब्दबाण सोडले आहेत. भारतीय लष्कराच्या पराक्रमाच्या आड भाजपचं घाणेरडं राजकारण लपवले जात आहे, असा थेट आरोप पटोले यांनी केला. पटोले म्हणाले की, आमचे वीर शूर आहेत, पण पंतप्रधानांच्या धोरणात शौर्य नाही, शरणागती आहे.

ट्रम्पने दिलं उत्तर, मोदी गप्प
नाना पटोले यांचा रोख सरळ अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांकडे होता. आपण युद्धबंदी का केली याचं उत्तर नरेंद्र मोदी देत नाहीत, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे, असं सांगत त्यांनी खुलासा केला की, ट्रम्प यांनी सार्वजनिकपणे 12 वेळा हे कबूल केलं की त्यांनी भारतावर पाकिस्तानासोबत युद्ध थांबवण्यासाठी दबाव टाकला होता. मोदींनी अमेरिकेपुढे शरणागती पत्करली होती का? असा थेट प्रश्न देशाला पडतोय. पंतप्रधानांनी आता तरी मौन सोडावं, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरही नाना पटोले यांनी जहाल शब्दांत टीका केली. गेल्या 11 वर्षांत मोदींनी जवळपास 100 देशांना भेटी दिल्या, पण एकही देश भारताच्या बाजूने पाकिस्तानविरोधात ठामपणे उभा राहिला नाही, असा आरोप त्यांनी केला. हे परराष्ट्र धोरण केवळ छायाचित्रं आणि व्हिडीओपुरतं मर्यादित राहिलं, असा दावाही त्यांनी केला. देशाची परराष्ट्र नीति ही ‘फोटोशूट डिप्लोमसी’ झाली आहे. त्यातून देशाला प्रत्यक्ष काही लाभ झाला नाही, असा टोला त्यांनी लगावला.
Rohit Pawar : कडूंना काहीही झाले, तर सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू पण देणार नाही
अमेरिकेपुढचं सरेंडर सांगा
आपण काँग्रेसवर कितीही टीका करा, शिव्या घाला याची आम्हाला पर्वा नाही. पण मोदी अमेरिकेपुढे झुकले का? हा प्रश्न भाजपने आधी स्वतःला विचारावा, असा थेट हल्लाबोल नाना पटोले यांनी केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारताच्या शौर्याला जगासमोर सिद्ध केलं, पण त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय शांततेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विरोधकांच्या मते, हे केवळ शांतता नव्हे तर एकप्रकारची रणनीतिक कमजोरी होती, जी आंतरराष्ट्रीय दबावाखाली आली.
या संपूर्ण घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, देशाच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणावरून सध्या राजकीय रणभूमी तापली आहे. शौर्याच्या पाठीमागे राजकारण दडपलं जातंय का? हा सवाल देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात घर करू लागला आहे.