महाराष्ट्र

Nana Patole : दावोसमधून उद्योग आणायचे होते, फसवेगिरी आली 

Congress : भाजप सरकारच्या घोषणांचा फसवणुकीचा पट

Share:

Author

भाजप-शिवसेना सरकारच्या पोकळ घोषणांनी महाराष्ट्राची जनता फसली, शेतकरी, कामगार आणि महिलांना दिलेली आश्वासने हवेत विरली. नाना पटोले यांनी सरकारच्या फसव्या धोरणांचा पर्दाफाश करत महाराष्ट्राच्या अधोगतीचा इशारा दिला.

भाजप-शिवसेना युती सरकारने आश्वासनांचा पाऊस पाडला, पण प्रत्यक्षात शेतकरी, कामगार आणि गरजू महिलांना सरकारने फसवलं आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत एकविसशे रुपये देण्याचे आश्वासन भाजप सरकारने केलं होतं, पण आज शंभर दिवस उलटूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही.

सरकारने दावोसहून हजारो कोटींची गुंतवणूक आणल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात राज्यातील बेरोजगारीचा आकडा गगनाला भिडला आहे. शेतकऱ्यांना बारा तास वीज देण्याचे वचनही पोकळ ठरले आहे. विजेअभावी शेती ठप्प होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या फसव्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Harshwardhan Sapkal : भाजपचा विकास म्हणजे उद्योगपतींची श्रीमंती

केवळ गाजावाजा

राज्यात शेतकरी निसर्गाशी झगडत असूनही सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांना कष्टाच्या मोबदल्यात उपासमारीची वेळ आली आहे. विजेअभावी पिके सुकत आहेत, ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत आहेत आणि दुरुस्तीला आठवडाभर लागतो. सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्याचा GDP शेतीमुळे वाढला, पण ही वाढ शेतकऱ्यांच्या हातात का दिसत नाही? दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त होत आहेत, पण सरकार डोळेझाक करत आहे. कामगारांची स्थितीही दयनीय आहे. ठेकेदारी व्यवस्थेने कामगारांचे शोषण सुरू आहे. कामगार विभागातील भ्रष्टाचाराने हा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. सरकारच्या कामगार कल्याण योजनेतून दिल्या जाणाऱ्या वस्तूंचा गैरवापर होत आहे. नोंदणीकृत कामगारांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. ठराविक लोक आणि दलालच या योजना गिळंकृत करत आहेत.

वाढत्या करांचे बोझे 

भाजप सरकारने दावोसहून मोठी गुंतवणूक आणल्याचा गाजावाजा केला, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात किती उद्योग आले? किती लोकांना रोजगार मिळाला? याची आकडेवारीच सरकारकडे नाही. वाढत्या करांच्या बोझ्यामुळे विद्यमान उद्योग राज्य सोडून जात आहेत. उत्पादन खर्च वाढल्याने व्यापारी आणि लघुउद्योग अडचणीत आले आहेत. सरकारने मोठ्या उद्योजकांना प्राधान्य दिले, पण स्थानिक व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडले आहे.

पर्यावरणाची हानी

गडचिरोलीसारख्या खाणींनी समृद्ध असलेल्या जिल्ह्यांत सरकारने मोठ्या उद्योगपतींसाठी खाणकाम खुले करून दिले आहे. पर्यावरणीय नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर जंगलतोड आणि प्रदूषण सुरू आहे. त्यामुळे स्थानिक आदिवासी जनतेचे जीवनमान धोक्यात आले आहे. त्यांच्या हक्काच्या जमिनी हडप करून सत्ताधारी पक्ष त्यांना विस्थापित करत आहे.

अधोगतीच्या मार्गावर महाराष्ट्र 

महागाई, वाढते वीज दर, रोजगाराचा अभाव, शेतकऱ्यांची होरपळ, उद्योगांचे पलायन अशी अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. केंद्राकडून विशेष आर्थिक मदतीची अपेक्षा होती, पण राज्य सरकार दिल्लीच्या आश्रयाला बसले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागला असून, जनतेच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारच्या ढिसाळ कारभारावर घणाघाती हल्ला चढवत स्पष्ट शब्दांत सांगितले की, भाजप-शिवसेना सरकार फसव्या घोषणांवर टिकले आहे. पण सत्य परिस्थिती अशी आहे की, महाराष्ट्र आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अधोगतीच्या मार्गावर आहे. राज्याच्या हितासाठी आणि गरीब, शेतकरी, कामगार, महिला यांच्या न्यायासाठी काँग्रेस मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!