
विदर्भातील महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात तगड्या संघर्षाची शक्यता आहे. महायुतीची युती टिकेल की स्वबळावर लढणार हे अजूनही अनिश्चित आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकीचा तिढा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तोंडावर आला आहे. पण विदर्भात राजकीय रंगभूमीवर वेगळेच नाट्य उलगडत आहे. विदर्भात सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील सामना ठरावा, असं पाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्र पक्षातील युती टिकेल की, शिंदे गट स्वबळावरच लढणार, याबाबत अजूनही कुठलाही ठोस निर्णय स्पष्ट झालेला नाही. अनेक ठिकाणी अशी माहिती मिळत आहे की, शिंदे गट स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. तर काही ठिकाणी महायुतीत एकत्र लढण्याच्या शक्यताही चर्चेत आहे.
महापालिका निवडणुकीचा रंग आणि फॉर्म्युला अजूनही अनिश्चित आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील शिवसेनेतही अंतर्गत वादांची लाट उभी झाली असून नाराजीची सुरुवात दिसून येत आहे. पूर्व विदर्भातील शिवसेना नेते आणि समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी या वादग्रस्त परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पक्षामध्ये सध्या कोणतीही नाराजी किंवा अंतर्गत भांडणं नाही. राजीनाम्यांच्या अफवा फेक न्यूज आहेत. भोंडेकर यांच्या मते, आगामी निवडणुकीसाठी पक्ष संघटन नव्याने मजबूत करण्याच्या प्रक्रियेत आहे. जिल्ह्यांची रचना बदलली जात आहे. ज्यामुळे काही संभ्रम निर्माण झाला होता. पण आता तो दूर करण्यात आला आहे.

महायुतीतील अंतर्गत कलह
आगामी 25 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत पक्षाची ताकद स्पष्टपणे दिसेल, असा विश्वास भोंडेकर यांनी व्यक्त केला. विदर्भात भाजपचे वर्चस्व खूप मजबूत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची या भागातील जनाधाराची विशेष नाळ जोडलेली आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीने 236 जागा जिंकून ताकद दाखवली. त्यात भाजपने 132, शिंदे गटाने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा मिळवल्या. मात्र, या यशानंतरही महायुतीतील अंतर्गत कलह पूर्णपणे संपलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कोल्ड वॉर अजूनही चर्चेचा विषय आहे.
फडणवीस सरकारकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना सुरक्षेचा अभाव, योजना अडथळा आणि पदाबाबत असंतोषामुळे नाराजी वाढत असल्याच्या चर्चा जोर धरल्या आहे. त्यामुळे शिंदे गट आता स्वबळावर महापालिका निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेत असल्याचे राजकीय विश्वात समजते. ही निवडणूक केवळ विदर्भातील सत्ता सांभाळण्याचा विषय नसून, भाजपसाठी प्रतिष्ठेचा लढा आहे. तर शिंदे गटासाठी स्वतंत्र ओळख आणि ताकद सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे. महायुतीच्या भवितव्यासाठीही या निवडणुकीत यश अपरिहार्य आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीचे परिणाम फक्त स्थानिकच नव्हे, तर राज्याच्या राजकारणावरही मोठा प्रभाव टाकणार आहेत.
Nagpur : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एव्हिएशनचा झेंडा फडकणार
विदर्भातील या राजकीय रंगभूमीवर कोणाचा वाटा मोठा ठरेल हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या मात्र दोन्ही गटांनी आपल्या भूमिकांवर ठामपणे पाय रोवले असून राजकीय शिडीवर चढण्याच्या तयारीत आहेत. येत्या काळात या संघर्षातून उदयास येणारे नवे समीकरण आणि परिणाम पाहणे अत्यंत मनोरंजक ठरणार आहे.