
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात दीक्षाभूमीला अभिवादन करत बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नवी ऊर्जा दिली. नागपूरकरांच्या उत्साही स्वागताने हा क्षण अधिक संस्मरणीय ठरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौऱ्यात सर्वप्रथम रेशीमबाग येथे जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी थेट दीक्षाभूमीकडे प्रस्थान केले आणि तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृतीस वंदन केले. आठ वर्षांनंतर पंतप्रधान मोदींनी पुन्हा दीक्षाभूमीला भेट दिली, हा क्षण संस्मरणीय ठरला.
मोदींच्या या दौऱ्याने नागपूर शहरात उत्साहाचे वातावरण होते. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून संघ मुख्यालयापर्यंत आणि त्यानंतर दीक्षाभूमीकडे जात असताना, भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या कमानी, भगवे आणि निळे ध्वज, तसेच लोकांच्या हातातील संविधानाच्या प्रती या दृश्याने शहर राष्ट्रवादी भावनेने भारावले होते.

परिवर्तनाचा साक्षीदार
दीक्षाभूमी हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे स्थळ आहे. येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. हा परिवर्तनाचा क्रांतिकारी क्षण होता, जो आजही सामाजिक समरसतेचा प्रतीक आहे. पंतप्रधान मोदींनी या पवित्र स्थळी वंदन करून सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्त्वांना अभिवादन केले.
मोदींच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्साही झाला होता. त्यांनी दीक्षाभूमीच्या प्रांगणात काही वेळ शांततेत व्यतीत केला आणि बाबासाहेबांच्या योगदानाचा पुनःस्मरण केला. या भेटीमुळे समता, बंधुता आणि न्याय यांसाठी सरकारची कटिबद्धता पुन्हा अधोरेखित झाली.
जनतेचे आत्मीय स्वागत
संघ मुख्यालयातून दीक्षाभूमीकडे निघालेल्या पंतप्रधानांच्या ताफ्याला पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. मोदींनी आपल्या वाहनातून लोकांना अभिवादन केले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी हातात कमळाचे चिन्ह आणि मोदींचे छायाचित्र असलेले फलक घेतले होते. नागरिकांनी संविधानाच्या प्रती हातात घेऊन त्यांचे स्वागत केले, ज्यामुळे या दौर्याला आणखी महत्त्व प्राप्त झाले.
पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याने नागपूरकरांचा उत्साह वाढला. हा क्षण नागपूरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेत कायमस्वरूपी कोरला जाईल. त्यांच्या उपस्थितीने दीक्षाभूमीच्या पावित्र्यात अधिक तेज आला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार अधिक दृढ झाला.