
नवनीत राणा पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत राजकारणाच्या रणांगणात उतरल्या आहेत. मुरशिदाबादच्या हिंसाचारावरून त्यांनी थेट ममता बॅनर्जींना लक्ष्य करत हिंदू समाजावरील अन्यायाचा मुद्दा मांडला आहे.
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या नवनीत राणांनी थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोपांचा भडीमार केला आहे. पश्चिम बंगालमध्ये सतत निवडणूकीदरम्यान घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांकडे लक्ष वेधत राणांनी हिंदू विचारसरणीच्या नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांचा मुद्दा चव्हाट्यावर आणला. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर बंगालमध्ये दरवेळी निवडणूकीच्या काळात हिंदू समाजाच्या लोकांवर हल्ले होतात, त्यांची घरे पेटवली जातात, व्यवसाय बंद पाडले जातात, असा स्पष्ट आरोप राणांनी केला.
राणांनी यावेळी ममतांच्या राजकीय धोरणांवर कठोर भाष्य करत सांगितले की, ममता दीदींना एक मोठा गैरसमज झाला आहे. त्या 2014 नंतर समजू लागल्या की, पश्चिम बंगालची ओळख बांगलादेशसारखी करता येईल. पण त्या विसरल्या की, आज देशाच्या पंतप्रधानपदी रामभक्त नरेंद्र मोदी आहेत, असे म्हणत नवनीत राणांनी केंद्राच्या नेतृत्वाचे समर्थन करत बंगाल सरकारवर टीकेचा बाण सोडला.

समाजावरील अन्याय
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या काळात जी प्रतिमा चालायची, ती आता चालणार नाही, असे नवनीत राणा यांचे मत आहे. देशात आता नवभारत निर्माणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सत्तेतील ममता बॅनर्जी यांची प्रतीमा जनतेने आता ओळखली आहे. निवडणूक आल्या की हिंसाचार वाढतो, आणि त्याचा बळी ठरतो तो सामान्य हिंदू नागरिक, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राणांनी ही प्रतिक्रिया देताना केवळ बंगालचीच नव्हे तर देशातील धार्मिक राजकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजवला आहे. त्यांनी हिंदू समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा करत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वावर संशय व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करत सांगितले की, आता काँग्रेसच्या काळात चालणारी प्रतिमा आणि कारभार लोक स्विकारणार नाहीत.
Ashish Jaiswal : विरोधकांच्या पाचशे रुपयांच्या प्रचाराचा फोडला फुगा
आक्रमक राजकीय अवतार
नवनीत राणांची ही भूमिका आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या वक्तव्याने केवळ ममता बॅनर्जी नव्हे, तर सर्व विरोधी पक्षांच्या धर्माधारित राजकारणावर घणाघात केला गेला आहे. राणांचा स्वभावतः स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक भाषणशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
राजकारणात आपल्या ठाम मतांमुळे ओळख निर्माण करणाऱ्या नवनीत राणा यांनी पश्चिम बंगालमधील सध्याच्या वातावरणाला दिलेला रामभक्तांचा प्रतिसाद, हा भाजपच्या राष्ट्रीय आखाड्यातील रणनितीचा भाग मानला जात आहे. ममता सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत, नवनीत राणांनी हिंदू समाजाच्या हक्कांसाठी दिलेला आवाज, पुढील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकू शकतो.