महाराष्ट्र

Navneet Rana : पश्चिम विदर्भाच्या दळणवळणाला अमरावती डिव्हिजनची प्रतिक्षा

Amravati : प्रगतीसाठी निर्णायक निर्णयाची गरज

Author

अमरावतीकरांची दीर्घकालीन मागणी असलेल्या स्वतंत्र रेल्वे डिव्हिजनसाठी प्रयत्न वेग घेत आहेत. माजी खासदार नवनीत राणा यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला असून, सरकारच्या निर्णायक निर्णयाची प्रतीक्षा आहे.

अमरावती शहर, पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचे केंद्र, आता एका मोठ्या रेल्वे डिव्हिजनच्या स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. शहरात आधीच अत्याधुनिक मॉडेल रेल्वे स्टेशन आहे, मात्र नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची दीर्घकालीन मागणी म्हणजे स्वतंत्र अमरावती रेल्वे डिव्हिजनची निर्मिती. ही मागणी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे मांडली आहे. आपण त्याचा पाठपुरावा करत असल्याचे राणा यांनी ‘द लोकहित लाईव्हशी’ संवाद साधताना सांगितले.

सध्या अमरावती शहर भुसावळ, नागपूर आणि नांदेड या डिव्हिजन्सच्या अंतर्गत येते. त्यामुळे येथील रेल्वे व्यवस्थापनासंबंधी कोणत्याही निर्णयासाठी संबंधित डिव्हिजन्सच्या मुख्यालयाशी संपर्क साधावा लागतो. यामुळे नागरिकांच्या तक्रारी, नवीन रेल्वेगाड्यांचे नियोजन आणि सुविधांच्या विस्तारासाठी विलंब होत आहे.

Amravati : अचलपूरात वाळू माफियांवर पोलिसांचा धडक छापा

सातत्याने पाठपुरावा

अमरावती डिव्हिजनची निर्मिती व्हावी यासाठी नवनीत राणा यांनी रेल्वे मंत्रालयाकडे अनेक वेळा मागणी केली आहे. त्यांनी अमरावतीतील मोठ्या रेल्वे स्टेशनला डीआरएम (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर) कार्यालय मिळावे यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून याबाबत सकारात्मक संकेत मिळाले असले तरी, अंतिम निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

बडनेरा हे अमरावतीतील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून, अनेक प्रमुख रेल्वेगाड्या येथे थांबतात. मोठे रेल्वे स्टेशन झाल्यास शहराच्या दळणवळणाच्या सुविधांना मोठी चालना मिळेल. याशिवाय, अमरावतीमध्ये एअरपोर्टच्या उभारणीसाठीही नवनीत राणा यांनी सतत प्रयत्न केले आहेत. जर मोठे रेल्वे स्टेशन आणि स्वतंत्र रेल्वे डिव्हिजन मिळाले, तर पश्चिम विदर्भाच्या संपूर्ण विकासाला गती मिळेल.

अपेक्षा आणि पुढील दिशा

अमरावती रेल्वे डिव्हिजनची निर्मिती झाल्यास, येथील स्थानिकांना तातडीने रेल्वे सेवा सुधारित स्वरूपात मिळू शकते. भविष्यात नवीन रेल्वेगाड्यांचे नियोजन, स्थानिक पातळीवरील तक्रारींचे निराकरण आणि शहराच्या विकासाला चालना मिळेल. त्यामुळे सरकारने लवकरच या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे.

अमरावतीला स्वतंत्र रेल्वे डिव्हिजन मिळावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नवनीत राणा यांनी या मागणीसाठी मोठा पाठपुरावा केला असून, रेल्वे मंत्रालयाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी स्थानिकांची आणि उद्योगपतींची अपेक्षा आहे. जर लवकरच अमरावतीला स्वतंत्र रेल्वे डिव्हिजन मिळाले, तर हा संपूर्ण पश्चिम विदर्भाच्या दळणवळणासाठी ऐतिहासिक निर्णय ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!