
छत्तीसगडच्या इंद्रावती जंगलात झालेल्या चकमकीत मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता सुधाकर उर्फ गौतम ठार झाला. त्याच्यावर सहा राज्यांमध्ये मिळून तब्बल तीन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
छत्तीसगडच्या घनदाट जंगलात 5 जून रोजी झालेल्या चकमकीत देशातील मोस्ट वॉन्टेड माओवादी नेता सुधाकर उर्फ गौतम ठार झाला. त्याच्यावर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगड अशा सहा राज्यांनी एकत्र मिळून तब्बल तीन कोटींचे बक्षीस जाहीर केले होते.
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत केंद्रीय समितीचा सदस्य, माओवादी चळवळीतील अत्यंत धोकादायक आणि जहाल नेता सुधाकरचा अखेर खात्मा झाला. सुधाकरचा मृत्यू हा गेल्या पंधरवड्यात माओवादी चळवळीवर बसलेला दुसरा जबरदस्त आघात ठरला आहे.

अनेक हिंसक कारवाया
महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा सीमेवरील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात माओवादी चळवळीतील वरिष्ठ नेते एकत्र जमल्याची गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. या माहितीनंतर छत्तीसगड पोलिसांच्या विशेष कार्यदलाने आणि जिल्हा राखीव गटाने जवळपास एक हजार जवानांच्या मदतीने व्यापक माओवादीविरोधी कारवाई सुरू केली. चकमक सुरू होताच जंगलात लपून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात सुधाकर उर्फ गौतम ठार झाला.
नरसिंहचलम नायडू उर्फ सुधाकर हा मूळचा आंध्रप्रदेशातील चिंतलपौडी येथील होता. त्याचे टेंटू लक्ष्मी, गौतम आणि नरसिंहचलम असे एकाहून अधिक छुपे नावं होती. तो माओवादी चळवळीचा केंद्रीय समिती सदस्य आणि विचारसरणीचा मुख्य प्रचारक म्हणून काम करत होता. सुधाकरचा अनेक हिंसक हल्ल्यांमध्ये सक्रिय सहभाग होता. तो पोलिसांवर घातपात, रेल्वे रुळ उखडून अपघात घडवणे, गावकऱ्यांना धमकावणे, जवानांवर अचानक हल्ले करणे यामध्ये आघाडीवर होता.
चळवळीच्या अस्ताची सुरुवात
छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात 21 मे रोजी माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवराजू याला ठार करण्यात आले होते. त्या चकमकीत तब्बल 26 माओवादी ठार झाले होते. या घटनेने माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला होता. त्यांच्या ताफ्यातील सर्वोच्च नेतृत्व हरपल्यामुळे चळवळ डळमळीत झाली होती. त्या घटनेतून सावरत नाही तोच 5 जून रोजी सुधाकरच्या मृत्यूने माओवाद्यांना आणखी मोठा धक्का दिला आहे. दोन आठवड्यांच्या आत दोन महत्वाच्या नेत्यांचा मृत्यू झाल्यामुळे माओवादी चळवळीचा कमकुवत झालेला पाय आता अधिकच ढासळत चालला आहे.
घडलेल्या चकमकीनंतर घटनास्थळी संपूर्ण जंगल परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळावर असून अजून काही माओवाद्यांचे मृतदेह सापडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी या भागात आपले लक्ष केंद्रित केले असून इतर लपलेले माओवादी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या काही वर्षांत सरकारने माओवादविरोधी मोहिम अधिक व्यापक केल्या असून अनेक महत्वाचे नेते ठार झाले आहेत. सुधाकरचा मृत्यू हा फक्त एका माओवादी नेत्याचा अंत नसून माओवादी चळवळीतील दीर्घकालीन धोरणात्मक योजनांना बसलेला मोठा फटका आहे. त्याच्या मृत्यूने केवळ जंगलातील बंदुका शांत झाल्या नाहीत, तर अनेक राज्यांतील सुरक्षा दलांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे चिन्ह ठरले आहे.