
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना अर्धांगवायू आल्याची माहिती समोर आली होती. यावर आता स्वतः धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बीड जिल्ह्यातील गाजलेल्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तत्कालीन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव समोर आल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. परिणामी मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या घडामोडींमध्ये धनंजय मुंडे यांची प्रकृतीही सतत चर्चेचा विषय बनली आहे. मात्र आता त्यांना अर्धांगवायू आजार झाल्याचे समोर येत आहे.
काही महिन्यांपूर्वी त्यांना बेल्स पाल्सी या न्युरोलॉजिकल आजाराचा सामना करावा लागला होता. राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी सांगितले, मुंडे यांना पॅरालिसिस झाला आहे. त्यांना बोलता येत नाही, डोळे देखील वाकडे झाले आहेत. त्यांनी असेही सांगितले की बीडमधील एका कार्यक्रमात गैरहजर राहण्यामागे मुंडेंची तब्येतच कारणीभूत होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर माध्यमांमध्ये चर्चेचा भडका उडाला. अनेक माध्यमांनी धनंजय मुंडेंना अर्धांगवायू झाल्याचेही सांगितले.

अफवा फेटाळली
संपूर्ण राज्यात मुंडे यांच्या आरोग्याबाबत अफवा पसरल्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वत: पुढे येत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की मी दीड महिन्यांपूर्वी बेल्स पाल्सीने त्रस्त होतो. त्यामुळे चेहऱ्यावर परिणाम झाला होता. अजूनही बोलताना त्रास होतो. पण मला अर्धांगवायू झालेला नाही. त्यांनी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या काळजीबद्दल आभार मानले. पुढे त्यांनी स्पष्ट केले की माझा आजार वैद्यकीयदृष्ट्या वेगळा आहे. मी अजून कोणत्याही नव्या आजाराने त्रस्त नाही. धनंजय मुंडेंची राजकीय वाटचाल देखील सध्या संकटांनी भरलेली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या अमानुष हत्येप्रकरणी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सीआयडी तपासातून स्पष्ट झाले. कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर सीआयडीने या प्रकरणाचा तपास गतीने सुरू केला. तपासात मिळालेल्या भयानक पुराव्यांमुळे कराडसह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे धक्कादायक फोटो देखील समोर आले. त्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली. यामुळेच धनंजय मुंडेंवर दबाव वाढला आणि त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
Bhandara : भाजप कार्यकर्त्यांनी कमळ सोडून काँग्रेसचा पकडला हात