
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आज 16 मार्च रोजी कोअर ग्रुपची निर्णायक बैठक घेणार आहे. महायुतीतील नाराजीच्या वादळात अजित पवार कोणती नवी रणनीती आखतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रणधुमाळीत सध्या विधान परिषद निवडणूक केंद्रस्थानी असताना, महायुतीत नव्या नाराजीचे वादळ उठले आहे. त्यातच महायुतीतील एक महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 16 मार्च रविवारी, मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर आपल्या कोअर ग्रुपची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे केवळ उमेदवार निवडीसाठीच नव्हे, तर महायुतीतील सध्या सुरू असलेल्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, अशी चर्चा सुरू आहे. मंत्रीपद, पदाधिकाऱ्यांच्या निवडीपासून ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत महायुतीतील तिढा वाढत असल्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत केवळ विधान परिषदेसाठी उमेदवार निश्चित केला जाणार नाही. तर महायुतीत आपली ताकद वाढवण्यासाठी आणि नाराजीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून काही ठोस पाऊले उचलली जातील का, याची उत्सुकता लागून आहे.

चार उमेदवार आघाडीवर
महायुतीतील वाटपानुसार, भाजपकडे 3 जागा गेल्या असून, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे प्रत्येकी एक जागा आहे. राष्ट्रवादीच्या या जागेसाठी अनेक इच्छुकांनी तयारी दाखवली असली तरी सध्या तीन नावांचीच चर्चा आहे. यामध्ये जीशान सिद्दीकी, संग्राम कोते पाटील, उमेश पाटील आणि संजय दौंड यांच्या नावांचा समावेश आहे.
जीशान सिद्दीकी यांचे नाव सर्वात पुढे आहे. दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाला पुढे नेण्याच्या दृष्टीने अजित पवार यांना मुस्लिम मतदारांमध्ये संदेश देण्यासाठी हा डाव खेळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. विशेषतः मुंबईतील मुस्लिम मतदारसंघांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असे निरीक्षण आहे. जीशान सिद्दीकी यांनी मागील विधानसभा निवडणुकीत बांद्रा (पूर्व) मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्याविरुद्ध लढत दिली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा विधान परिषदेमार्फत त्यांना संधी दिल्यास, हा पराभव भरून काढण्याचा अजित पवार यांचा डाव असू शकतो.
पुढील रणनिती
नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2025 आहे. तर मतदानाची तारीख 27 मार्च 2025 आहे. या निवडणुकीत महायुतीतील एकजूट टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका केवळ विधान परिषद नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा निवडणुकांसाठीही दिशा ठरवणारी ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उमेदवार निश्चित होणार आहे. अशातच अजित पवार यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देखील आली आहे. महायुतीतील नाराजी, सत्तासंघर्ष आणि आगामी निवडणुकांतील धोरणात्मक निर्णयांवरही चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. अजित पवार यांचा पुढील डाव काय असेल? ते महायुतीतील नातेसंबंध दृढ करतील की आपली ताकद वेगळी दाखवतील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राजकीय वर्तुळात अजित पवार कोणती नवी चाल खेळणार, यावर सगळ्यांचे लक्ष खिळले आहे.